जळगाव : पुढारी वृत्तसेवा
चोपडा तालुक्यातील मितावली येथे लहान भावाने मोठ्या भावावर विळ्याने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
चोपडा तालुक्यातील मितावली येथे संदीप प्रताप पाटील आणि सतीश प्रताप पाटील (३६) हे दोन भाऊ वास्तव्याला आहेत. हे दोघेही वडिलोपार्जीत शेती करून उदरनिर्वाह करतात. दरम्यान, दोन्ही भाऊ पारगाव शिवारात काम करण्यासाठी सोबत गेले असताना दोघा भावांमध्ये जोरदार वाद झाला. या वादात सतीश याने सख्खा मोठा भाऊ संदीप याच्यावर विळ्याने वार केले. यात संदीपचा जागीच मृत्यू झाला. वार्यासारखी ही बातमी पसरल्याने ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश रावले, एपीआय गणेश बुवा पी.एस.आय.चंद्रकात पाटील यांनी आपल्या सहकार्यांसह भेट देऊन तपास सुरू केला. दोन्ही भावांमध्ये नेमका कशावरून वाद झाला याची माहिती अद्याप समजली नाही. तर सतीश पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.