जळगाव : पुढारी वृत्तसेवा
उधारीचे १० हजार रुपये परत न केल्याच्या कारणातून मित्राचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघडकीस आला.
सोमवारी (दि.3) सकाळी ११ च्या सुमारास भादली ते शेळगावदरम्यान पुलानजीकच्या पाटचारीत रस्त्याने जाणार्या नागरिकांना युवकाचा मृतदेह आढळला. याबाबत पोलिसांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये युवकाच्या गळ्यावर व कपाळावर घाव घालण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यानंतर एलसीबीने तपासचक्र गतिमान करीत अवघ्या तीन दिवसांत गुन्हा उघडकीस आणला. शहरातीलच सौरभ यशवंत चौधरी (३१, रा. दशरथनगर, जळगाव) असे मयत युवकाचे नाव असून, खून प्रकरणी मयताचा मित्र ईश्वर नथ्थू सपकाळे (२५, रा. कानळदा) यास कानळदा शिवारातून अटक करण्यात आली आहे.