नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने हतनूर धरणातून तापी नदीपात्रात 2 लाख 63 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पातून 3 लाख 35 हजार क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे. तर सारंगखेडा प्रकल्पातून 1 लाख 46 हजार क्युसेक्स व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पातून 1 लाख 22 हजार क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. पुढील तीन ते चार तासात सारंगखेडा व प्रकाशा मॅरेज प्रकल्प तीन लाख क्युसेक पर्यंत विसर्ग वाढू शकतो.
त्यामुळे तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी केले आहे.