नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शुक्रवार (दि. २) पर्यंत थेट सरपंच पदासाठी एकूण ५६१ अर्ज प्राप्त झाले, तर सदस्य पदांसाठी २,६६७ नामनिर्देशने दाखल झाली. साेमवारी (दि. ५) सर्व अर्जांची छाननी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यात १४ तालुक्यांत १९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या अंतर्गत अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि. २) तहसील कार्यालयांमध्ये गर्दी झाली होती. त्यावेळी सदस्य पदांसाठी १,८०१ तसेच थेट सरपंच पदांकरिता ३६० उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातून अंतिमत: सदस्यांसाठी २,६६७ व सरपंचांसाठी ५६१ नामनिर्देशन प्रशासनाकडे सादर झाली आहेत. निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया सोमवारी (दि. ५) सकाळी ११ पासून राबविण्यात येईल. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार असून, माघारीसाठी ७ डिसेंबरला दुपारी ३ पर्यंत मुदत असेल. ही मुदत संपल्यानंतर लगेचच रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तसेच १८ डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान पार पडणार आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी इच्छुकांसह सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. त्यामुळे माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल.
जिल्ह्यात दाखल अर्जांची संख्या अशी…
तालुका सरपंच सदस्य
चांदवड 201 946
बागलाण 162 798
येवला 37 129
इगतपुरी 10 54
नांदगाव 75 345
कळवण 70 384
त्र्यंबकेश्वर 05 33
निफाड 145 1012
मालेगाव 69 414
नाशिक 82 464
देवळा 56 350
दिंडोरी 28 149
सिन्नर 80 363
पेठ 06 11
एकूण 561 2667