नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
माणसाला माणूसपण म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा व भारतीय संविधानानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे 125 कामगार कायदे लागू केले होते, ते या केंद्रातील भाजप सरकारने व महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने मोडीत काढण्याचे ठरविले आहे. आगामी काळात या सरकारचा विरोध करून त्यांना त्यांची जागा दाखवा. आगामी काळात कामगार कायद्यांची पायमल्ली होणार असल्याने यासाठी चळवळ उभी करणार असल्याचे प्रतिपादन डॉ. डी. एल. कराड यांनी केले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई यांच्या वतीने दिल्या जाणारा गं. द. आंबेकर जीवनगौरव पुरस्कार राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांना व बालकवी किरण भावसार यांना श्रमगौरव पुरस्कार मिळाला. सिन्नर तालुका सीटू संघटना व कामगार शक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वाचनालय येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. सिन्नर वकील बारचे अध्यक्ष अॅड. जयसिंग सांगळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख पाहुण्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे होत्या. यावेळी नाशिक वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष हरिभाऊ तांबे, कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार, महामित्र दत्ता वायचळे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगझाप, मसापचे श्यामसुंदर झळके, अॅड. आत्माराम उगले, प्रा. राजाराम मुंगसे, कॉम्रेड संतोष कुलकर्णी, बाळासाहेब सानप, सिंधुताई शार्दुल आदींसह माळेगाव, मुसळगाव एमआयडीसीतील कामगार बंधू, भगिनी उपस्थित होते.
अॅड. अण्णासाहेब सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र गिरी, भाऊसाहेब पवार यांनी आभार मानले.
लेखणीतून कामगारांच्या व्यथा मांडणार : भावसार
या सत्काराने आपण अगदी भावुक झालो असल्याचे किरण भावसार यांनी सांगितले. माझ्या लेखणीचा वापर कामगारांच्या व्यथा व समस्या मांडण्यासाठी करेन. पुरस्कार मिळाल्यानंतर सर्व नागरिक, कामगारांचे आभार मानले.