नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय खादी ग्रामोद्योग मंत्री नारायण राणे यांच्याशी संपर्क करून त्र्यंबकेश्वर रोडवरील खादी ग्रामोद्योगच्या जागेवर योग आणि आयुर्वेद विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 10) दिली. एका खासगी समारंभासाठी ना. फडणवीस नाशिक दौर्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
ना. फडणवीस म्हणाले की, नाशिकला योग, आयुर्वेद विद्यापीठाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच नैसर्गिक शेती हे मिशन हाती घेतले जाणार असून, त्यासाठी आधी प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर सर्व शेतकर्यांना प्रशिक्षण दिले जाईल. यातून शाश्वत जीवन पद्धती तयार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांना आरोप करण्याची सवय असल्याचे सांगत त्यांनी कधी तरी अंतर्मनात शिरून पाहिले पाहिजे असा सल्लाही दिला. तर खासदार संजय राऊत यांच्याबाबत विचारले असता त्यांच्या तुरुंगवासाची तुलना लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांशी केली जात आहे, यावर मी फक्त स्मितहास्य देईल असे सांगितले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा असो की आणखी कोणती, महाराष्ट्रात कोणतीही यात्रा आली तरी तिला संरक्षण देण्याची जबाबदारी आमची असते. यात्रा संपल्यानंतरच तिच्या प्रतिसादाबद्दल चित्र स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.