

श्रीरामपूर: शहरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैय्या यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ तसेच संघटित गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या टोळ्यांवर मकोका किंवा इतर संबंधित कायद्यांतर्गत प्रभावी कारवाईच्या मागणीसाठी श्रीरामपुरात सर्वपक्षीय व व्यापाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. १५) भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाद्वारे श्रीरामपूरकरांनी जणू गुन्हेगारीविरुद्ध जनआक्रोश केला आहे. दरम्यान, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी अहिल्यानगर येथे गुन्हेगारीचा आढावा घेतला.
या मोर्चात शहरासह तालुक्यातील विविध भागातील नागरिक सहभागी झाल्याने संपूर्ण शहरात तीव्र भावना व्यक्त झाल्या. बुधवारी चौथ्या दिवशीही श्रीरामपुरात कडकडीत बंद पाळला होता. शहर बंद मागे घेतला असला तरी आता वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आ. हेमंत ओगले यांनी दिला.
बुधवारी सकाळी १० वाजता हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आल्यानंतर मेनरोड, छत्रपती शिवाजी महाराज रोडमार्गे मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ पुष्पहार अर्पण करून मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले. मोर्चामध्ये व्यापारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “आकाश दुबैय्या यांना न्याय मिळालाच पाहिजे”, “संघटित गुन्हेगारीचा कायमचा बंदोबस्त करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांनी शहरात वाढलेल्या गुन्हेगारीबाबत तीव्र चिंता व्यक्त करत संबंधित टोळ्यांविरुद्ध कठोर कारवायांची मागणी केली.
मोर्चानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात आकाश दुबैय्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, संघटित गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या टोळ्यांवर मकोका किंवा इतर संबंधित कायद्यांतर्गत प्रभावी कारवाई करावी, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. आ. हेमंत ओगले, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, लहू कानडे, भानुदास मुरकुटे, सचिन गुजर, दीपक पटारे, अशोक थोरे, सुनील मुथा, रामदेव धीवर, वैशाली चव्हाण, सचिन गुजर, प्रकाश चित्ते, कैलास दुबैय्या, शेखर दुबैय्या यांची भाषणे झाली.
सभेनंतर आ. हेमंत ओगले, कैलास दुबय्या, शेखर दुबय्या यांनी सकल श्रीरामपूरवासीयांनी, व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभागी होऊन सलग चार दिवस व्यवसाय बंद ठेवून आम्हाला साथ दिली; आमच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल आभार मानले. दुपारनंतर सर्व व्यावसायिकांनी दुकाने सुरू करावीत, असे आवाहन त्यांनी केले. श्रीरामपूर शहर बंदचा निर्णय मागे घेतला असला तरी आता माघार नाही, याविरुद्ध वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आ. हेमंत ओगले यांनी दिला. गुन्हेगारांना मदत करणाऱ्या चार पोलिसांना हद्दपार करावे अशी मागणीही त्यांनी केली.
अन्यथा मला हत्यार द्या!
तीन दिवस बंद पाळल्यानंतरही पोलिसांकडून ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने, मयत आकाशच्या वडिलांनी मोर्चात संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. शेखर दुबय्या म्हणाले, ‘बेग आणि जेधे या दोघांनी मिळून माझ्या मुलाला मारले आहे. त्यांना फाशी झाली पाहिजे. कोणाच्यात दम नसेल, तर मला हत्यार द्या...’
सोनू बेग दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग
सोनू ऊर्फ जयप्रकाश अशोक बेग यास बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगल्याच्या गुन्ह्यात वर्ग करून पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. शहरातील फ्लॅटमध्ये पोलिसांनी एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे जप्त केली होती. या प्रकरणातील गुन्ह्यात वर्ग करून सोनू बेगला अहिल्यानगर मध्यवर्ती कारागृहातून प्रोडक्शन वॉरंट घेऊन न्यायालयात हजर केले असता, त्यास न्यायालयाने दि. १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
सर्वांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे: आ. कोल्हे
गुन्हेगार प्रवृत्तींनी पोलिस, महसूल ही संपूर्ण व्यवस्थाच काबीज केलेली आहे. आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असे परखड मत आ. विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले. आ. कोल्हे यांनी दुबैय्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. कोल्हे म्हणाले, की सर्वांनीच एकत्र येऊन पक्षीय जोडे बाजूला ठेवून विशेष एक मोहीम हाती घेतली पाहिजे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून सर्व सराईत गुन्हेगारांवर सरसकट कारवाई करावी. आज आकडेवारी पाहता महाराष्ट्रामध्ये मुंबईनंतर गुन्हेगारीमध्ये अहिल्यानगर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आकाशला न्याय मिळेपर्यंत त्यांच्या परिवारामागे उभे राहणार असल्याचेही आ. कोल्हे यांनी सांगितले.