

संगमनेर : निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली. या योजनेसाठी राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयातून तालुक्यातील सुमारे 90 हजार महिलांचे लाडकी बहीण योजनांचे फॉर्म भरण्यात आले, यानंतर या महिलांना त्याचा लाभही मिळाला. मात्र नुकत्याच सरकारने 17967 महिलांना या योजनेतून वगळल्याने महिलांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाल्याची भावना महिला काँग्रेसचे अध्यक्ष अर्चनाताई बालोडे यांनी व्यक्त केली.
महायुती सरकारने 2024 मध्ये लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेत तालुक्यातील महिलांना लाभ मिळावा याकरता यशोधन कार्यालयातील यंत्रणेने रात्रंदिवस काम करून तालुक्यातील सुमारे 90 हजार महिलांना याचा लाभ मिळवून दिला. डिसेंबर 2025 पर्यंत महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. मात्र आता सरकारने विविध कारणे दाखवून या योजनेतील 17967 महिलांना वगळले आहे.
याचबरोबर निवडणुकीपूर्वी महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही हवेत विरले असून महिलांना मिळत असलेल्या रकमेतही कपात झाली आहे. अनेक महिलांना सातत्याने हेलपाटे मारावे लागत आहे. केवायसी करून देखीलही महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही तर अनेक गरीब महिलांच्या नावापुढे सरकारी नोकरी असा शेरा पोर्टलवर येत आहे. त्यामुळे पात्र व गरीब महिलांना या योजनेपासून दूर राहावे लागत आहे. दरम्यान, सरकारने फक्त निवडणुकीसाठी या घोषणा केल्या का, असा सवाल आता केला जात आहे.
निवडणुकीपूर्वी महिलांना 2100 रुपये देऊ, असे आश्वासन सरकारने दिले होते. ते पैसे तर दिलेच नाही परंतु आहे त्या योजनेतून आम्हाला वगळले आहे. याचबरोबर आम्ही गरीब असून सुद्धा आमच्या नावापुढे ‘सरकारी नोकरी’ असा शेरा येत आहे, हा काय प्रकार आहे कळत नाही. गरिबांना फसवण्याचा प्रकार असल्याची टीका वडगाव पान येथील मीना थोरात यांनी केली.