

राहुरी: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात अनोखा सोहळा पार पडला. यावेळी एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्यातून देशातील पहिले ‘बायोहॅपीनेस सेंटर’ महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू करण्यात आले, ही बाब विशेष उल्लेखनिय आहे. दरम्यान, या उपक्रमामुळे जैवविविधतेचे संवर्धन, पारंपरिक वाणांचे जतन व पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
महिलांचे अन्न उत्पादन, पोषण व्यवस्थापन व शेती उत्पादन प्रक्रियेतील मोलाचे योगदान लक्षात घेता, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज ठरली आहे. ग्रामीण भागातून शहरांकडे वाढत्या स्थलांतरामुळे शेतीतील मजुरांची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत महिलांना इंटरनेटसह डिजिटल तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्या स्मार्टफोनच्या माध्यमातून अधिक सक्षमपणे शेती करू शकतील, असे प्रतिपादन एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या माजी महानिदेशक व जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी ऑनलाइन मार्गदर्शनातून केले.
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास खर्चे होते. चेन्नई येथील एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या वरिष्ठ फेलो डॉ. आर. व्ही. भवानी या प्रमुख पाहुण्या तर, छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने, पुणे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व स्मार्ट प्रकल्प तज्ज्ञ उज्वला बाणखिले या विशेष अतिथी होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. स्वामीनाथन यांनी ‘बायोहॅपीनेस’ संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले. मानव, पर्यावरण आणि जैवविविधता यांचा समतोल राखत सर्वांनी आनंदी व समृद्ध जीवन जगणे हीच खरी प्रगती आहे, असे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी, यावेळी महिलांच्या शेतीतील योगदानाचा गौरव केला. विद्यापीठाने विकसित केलेले एकात्मिक शेती पद्धती मॉडेल शेतकरी प्रथम प्रकल्पाच्या माध्यमातून चिंचविहीरे, कणगर, तांभेरे व कानडगाव येथील महिला शेतकऱ्यांनी यशस्वी राबविले आहे. या प्रयोगामुळे गावांचे कृषी उत्पन्न दीड कोटींवरून साडेतीन कोटींपर्यंत वाढले आहे. ‘फुले समृद्ध व्हिलेज’ अभियान माध्यमातून ही संकल्पना तब्बल 10 जिल्ह्यांतील 10 गावांमध्ये राबविण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पातील महिला शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. चिंचविहीरे, कणगर, तांभेरे व कानडगाव येथील महिला शेतकऱ्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील शेडशळ येथील महिला शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश होता.
यावेळी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 10 जिल्ह्यांतील 10 गावांमध्ये ‘फुले समृद्ध व्हिलेज’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. नाशिक व जळगाव जिल्ह्यातील 30 गावांमध्ये ‘फुले पोकरा - संजीवनी व्हिलेज’ अभियान सुरू करण्यात आले. 17 कृषी विज्ञान केंद्रे व 10 कृषी तंत्रज्ञान विद्यालयांमध्ये ‘फुले एकात्मिक शेती पद्धती मॉडेल मिशन’चा यावेळी श्रीगणेशा करण्यात आला. प्रारंभी नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रात ‘बायोहॅपीनेस सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले. यानंतर पाहुण्यांनी निसर्ग प्रक्षेत्र, रोपवाटिका व उद्यानविद्या फळपीक प्रात्यक्षिक प्रक्षेत्रांना भेट देऊन विविध प्रकल्पांची पाहणी केली. प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले, तर आभार संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी मानले. यावेळी शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शेतकरी व महिला उपस्थित होत्या.