

संगमनेर : लाँग मार्चचा काल गुरूवारचा मुक्काम निझर्णेश्वरला झाला. आज शुक्रवारचा दुसरा मुक्काम लोणी येथील पालकमंत्र्यांचा वाड्याजवळ असणार आहे. कायदा, नियम, काय व्हायचे ते होऊ द्या. अहिल्यानगर लांब आहे, आता मुक्काम लोणीतच असणार. आहार कर्मचारी, शालेय पोषण आहाराचा संप लोणीतून महाराष्ट्रभर सुरू होईल आणि तो किती दिवस चालवायचा हे आम्ही ठरवू. हटायचे नाही लोणी हेच आता आंदोलनाचे केंद्र, असा निर्धार डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय किसान सभा व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या संघटनांच्या वतीने शेतकरी व कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी
राजरहून निघालेला किसान सभेचा लाँग मार्च बुधवारी (दि.25) रात्री संगमनेरात दाखल झाला. नवीन नगर रोड वरील प्रांताधिकारी कार्यालयासमोर बुधवारचा मुक्काम करण्यात आला. गुरुवारी (दि.26) सकाळी या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी शासनावर प्रशासनावर, टीका करत विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले.
डॉ. अजित नवले म्हणाले की, आंदोलनाचा तंबू हेच आमचे मंदिर आहे. याचा पवित्र वारसा चालवण्याचे काम चळवळीतील लोकांनी केले. परंतु पालकमंत्री देव मानणारे आहे. निवडणुकीचा नारळ ते निझर्णेश्वर मंदिरात फोडून आशीर्वाद घेतल्याशिवाय काहीच करत नाही. आम्ही माणसे निझर्णेश्वरला पहिला मुक्काम करणार आहे. तेथून पालकमंत्र्यांना साकडे घालणार आहे. आमच्या रेल्वेचे काय झाले. कर्मचाऱ्यांचे काय झाले, ग्रामपंचायतचे काय झाले, बांधकाम कामगारांचे कायदा झाले, आशा कर्मचाऱ्यांचे, शालेय पोषणचे, आदिवासींच्या कामाचे काय झाले, असा सवाल करत गुरूवारचा पहिला मुक्काम निझर्णेश्वरला करण्याची त्यांनी घोषणा केली.
अधिकाऱ्यांचा फोन आला, मंत्रालयातून फोन आला. तुमची चांगली व्यवस्था करतो पण आम्ही शासनासमोरच आंदोलन करणार आहे. पहिला मुक्काम निझर्णेश्वरला झाल्यानंतर शुक्रवारचा (दि.27) दुसरा मुक्काम लोणी पालकमंत्र्यांचा वाडा असणार आहे. दुसरीकडे थांबणार नाही, कायदा नियम काय व्हायचे ते होऊ द्या, कोडं सोडल्याशिवाय उठणार नाही. पुणतांब्यातून एकदा शेतकऱ्यांचा संप सुरू झाला होता. आता दुसरा आहार कर्मचारी, शालेय पोषणाचा संप लोणीतून महाराष्ट्रभर सुरू होईल आणि तो किती दिवस चालवायचा हे आम्ही ठरवू, हटायचे नाही लोणी हेच आता आंदोलनाचे केंद्र वाड्यासमोर बसायचे आणि प्रश्न सोडायचा असा निर्धार करून हा लाँग मोर्चा कॉम्रेड सदाशिव साबळे यांचे नेतृत्वाखाली निझर्णेश्वरच्या दिशेने निघाला.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक वळविण्यात आली होती. यावेळी राजा अवसक, रजत अवसक, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, हेमलाता शेळके, संगीता साळवे, प्रकाश साबळे, गणेश ताजने, ज्ञानेश्वर काकड, अनिता साबळे, संतोष शिर्के, नंदा बांगर आदिसह नागरिक, महिला उपस्थित होते.
पुणतांब्यातून एकदा शेतकऱ्यांचा संप सुरू झाला होता. आता दुसरा संप आहार कर्मचारी, शालेय पोषणाचा लोणीतून महाराष्ट्रभर सुरू होईल आणि तो किती दिवस चालवायचा, हे आम्ही ठरवू, हटायचे नाही. लोणी हेच आता आंदोलनाचे केंद्र. वाड्यासमोर बसायचे, दुसरीकडे थांबणार नाही. कायदा नियम काय व्हायचे ते होऊ द्या, आता उठणार नाही, असा निर्धार डॉ. अजित नवले यांनी केला.