

नगर तालुका: अहिल्यानगर– छत्रपती संभाजीनगर मार्गावरील जेऊर (बा.) येथे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने लांब पल्ल्याच्या, तसेच मार्गावरून धावणाऱ्या सर्व एसटी बसगाड्यांना जेऊर येथे थांबा देण्याच्या सूचना राज्य परिवहन विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे जेऊर व परिसरातील विद्यार्थी, महिला, वृद्ध, तसेच रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जेऊर येथे बसथांबा असतानाही अनेक बसगाड्या थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, तसेच नागरिकांना विविध कामांसाठी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर व इतर शहरांकडे जाताना अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः सकाळच्या वेळेस शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आणि रात्रीच्या वेळी परतीच्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.
याबाबत निवृत्त पोलिस अधिकारी भानुदास हसनाळे यांनी गांभीर्याने लक्ष वेधत मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीची दखल घेत राज्य परिवहन विभागाच्या अहिल्यानगर विभागाने संबंधित आगारांना जेऊर येथे प्रवासी व विद्यार्थी चढ-उतार करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची मागणी आता मार्गी लागली आहे.
चालक-वाहकांनी नियम पाळणे गरजेचे
जेऊर येथे बस थांबविण्याच्या सूचना झाल्यानंतर आता संबंधित बसगाड्यांच्या चालक-वाहकांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. बसथांब्यावर प्रवासी किंवा विद्यार्थी उभे असताना बस न थांबण्याची समस्या पुन्हा निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.