

जामखेड: आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रासायनिक खतांच्या उपलब्धतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सन २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी विविध प्रकारच्या खतांची एकूण २२ हजार ४१४ मेट्रिक टन मागणी नोंदविली असताना त्यापैकी केवळ १४ हजार ३०७ मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच खतांच्या उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार युरियाची ९ हजार २८ मेट्रिक टन मागणी असताना केवळ ५ हजार ७५९ मेट्रिक टन आवंटन मंजूर करण्यात आले आहे. डीएपी खताची २ हजार ३११ मेट्रिक टन मागणी असून, त्यापैकी १ हजार २९२ मेट्रिक टन आवंटन मंजूर झाले आहे. एमओपी खतासाठी १ हजार ३७५ मेट्रिक टन मागणीच्या तुलनेत केवळ ३५६ मेट्रिक टन आवंटन मिळाले आहे. एसएसपी खताची २ हजार ८८४ मेट्रिक टन मागणी असताना फक्त २१३ मेट्रिक टन आवंटन मंजूर करण्यात आले आहे, तर एनपीके खतासाठी ६ हजार ८६१ मेट्रिक टन मागणीच्या तुलनेत ६ हजार ६८७ मेट्रिक टन आवंटन मंजूर झाले आहे.
गेल्या २४ एप्रिलअखेर युरियाचा ७७६ मेट्रिक टन, डीएपीचा २३३ मेट्रिक टन, एमओपीचा 53 मेट्रिक टन, एसएसपीचा ६२८ मेट्रिक टन आणि एनपीकेचा २ हजार १०६ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला होता. त्यानंतर गेल्या २२ मेपर्यंत युरियाचा ५७० मेट्रिक टन, डीएपीचा १८६ मेट्रिक टन, एमओपीचा ३५ मेट्रिक टन, एसएसपीचा ६४ मेट्रिक टन आणि एनपीकेचा २ हजार २०४ मेट्रिक टन पुरवठा झाल्याची माहिती आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला असताना खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विशेषतः पेरणीपूर्व काळात युरिया, डीएपी आणि एनपीके खतांना मोठी मागणी असते. मात्र मंजूर आवंटन आणि प्रत्यक्ष उपलब्धता यामध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे. वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खतांचा पुरवठा न झाल्यास पेरणी व पीक व्यवस्थापनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कृषी विभागाने शेतकर्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खतांची खरेदी करावी, तसेच अनावश्यक साठेबाजी टाळावी, असे आवाहन केले आहे. आगामी काळात खतांचा अतिरिक्त पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे.
कोणताही खत किंवा बियाणे विक्रेता कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार करत असल्याचे आढळल्यास शेतकर्यांनी तत्काळ जामखेड तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
रवींद्र घुले, तालुका कृषी अधिकारी, जामखेड