

सोमनाथ मैड
सावेडी: महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नोंदणी शुल्क कार्यालयात विविध दस्त नोंदणीसाठी शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होत आहे. सरकारी काम असल्याने शेतकरी मध्यस्थांचा आधार घेतात. हे मध्यस्थच स्वतःसह दस्त नोंदणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ‘हिस्सा’ म्हणून शासकीय शुल्काच्या पाच ते दहा पट रक्कम कर्ज मिळविण्यासाठी नडलेल्या शेतकऱ्यांकडून वसूल करीत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहे.
शहरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पराग बिल्डिंग येथील दुय्यम निबंधक कार्यालय, क्रमांक 3 मध्ये विविध दस्त नोंदणीसाठी शेतकरी, सामान्य नागरिकांना जावे लागते. शेतकऱ्यांनी अशा दस्त नोंदणी रीकन्वियन्स डीडकरिता जाणकार सनदी मध्यस्थामार्फतच सर्व कामे करावीत, अशी अलिखित अट बँक अधिकारी घालतात. त्यांनी सुचवलेले सनदी मध्यस्थ दस्त नोंदणीपेक्षा आधीच विविध संकटांनी जर्जर झालेल्या शेतकरी कर्जदारांकडून पाच ते दहा पट रक्कम वसूल करीत आहेत. यातून शेतकऱ्यांची म्हणजेच बँक ग्राहकांची सर्रास लूट होत आहे. शेतकऱ्याला किमान दरसाल कर्जाची गरज भासते. अशावेळी पुढील काळात कर्ज प्रकरणात कायदेशीर अडचण येऊ नये, आजचे काम परफेक्ट व्हावे, यासाठी जाणकार सनदी मध्यस्थांकडून होत असलेल्या लुटीचे समर्थन करून बँकांचे अधिकारी शेतकरी ग्राहकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतातच’ शिवाय या लुटीचे समर्थनही करतात.
बँक अधिकाऱ्यांकडून सुचविण्यात येणारे हे माहीतगार एकूण फीमध्ये स्टॅम्प ड्युटी, बॉण्ड, चलन, नोंदणी शुल्क यासह नोंदणी कार्यालयातील अधिकारी, लिपिक यांना ‘मलिदा’ द्यावा लागत असल्याचे सांगत सरकारी फीच्या पाच ते दहा पट रक्कम उकळतात. आपले काम अडू नये, नव्या हंगामासाठी कर्ज तत्काळ उपलब्ध व्हावे व पुढच्या वर्षी अडचणी येऊ नयेत, यासाठी शेतकरी भली मोठी किंमत मोजतात. आपली लुटमार होत असल्याचे दिसूनही हतबलतेमुळे पैसे द्यावे लागतात. शेतकरी दर कर्ज प्रकरणाच्या वेळी असा नागवला जातो, ही भयाण कैफियत दस्त नोंदणीकरिता आलेल्या नगर तालुक्यातील एका शेतकऱ्याने ‘पुढारी’कडे मांडली.
दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, तसेच बँकांचे अधिकारी यांना जाणकार सनदी मध्यस्थाकडून होणारी शेतकऱ्यांची लुटमार माहीत आहेच. शिवाय तेदेखील लाभार्थी असल्याने प्रशासन या लुटकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. उलटपक्षी समर्थनच करते, हे भीषण वास्तव आहे. कर्जासाठी नडलेला शेतकरी ग्राहक या सर्वांसाठी वाहती गंगाच ठरतो. प्रत्येकजण त्यात स्वतःचे हात ओले करतो. मात्र काही मंडळी अंघोळच करीत असतील, तर अशा लूटमारीला चाप बसणे आवश्यक असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. नोंदणी शुल्क कार्यालयात होत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या लुटीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दस्त नोंदणीकरिता किती स्टॅम्प ड्युटी बसवावी, यावर निर्णय देण्याची गरज आहे. तसेच नोंदणी शुल्क कार्यालयात फी संदर्भात माहिती फलक बनविण्यास सूचना गरजेचे असल्याचेही शेतकऱ्यांचे मत आहे.
दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांसमोर दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या शेतकरी, ग्राहकांची सनदी माहीतगार लूट करीत आहेत, हे माहीत असूनही प्रशासन त्यास मूकसंमती देत असेल तर कार्यालयातील ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.
वसंत लोढा, संस्थापक, पंडित दीनदयाळ पतसंस्था
चार हजार रुपये उकळले
शेतकऱ्याने कर्जाची पूर्णतः परतफेड केल्यानंतर जमिनीवरील बोजा उतरविण्यासाठी बँकेचा कर्मचारी नोंदणी शुल्क कार्यालयात उपस्थित असणे क्रमप्राप्त आहे. एका बँकेच्या सावेडी शाखेने कर्ज प्रकरण रीकन्वियन्स करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून चार हजार रुपये उकळले.
जाणकाराची प्रचंड गर्दी होत आहे. मात्र यांच्या माध्यमातून कार्यालयीन कामकाजासाठी जास्त पैसे आकारणी होत असेल तर त्यावर निर्बंधासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात येईल. तसेच कार्यालयातील पारदर्शकता तसेच कार्यालयातील व्यवहाराबाबत पारदर्शकतेसाठी प्रयत्न केले जातील.
सुधीर पाटील, उपविभागीय अधिकारी, नगर