

उंबरे : ब्राम्हणी गावात दोन गटात जोरदार राडा झाल्याचे दिसले. गावातील शांतता भंग करण्याचा हा प्रकार असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. गावातील अवैध व्यवसाय, यातून वाढती भाईगिरी आणि कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न, यामुळे ब्राम्हणी गावातील संतप्त तरुणांनी पोलिस प्रशासनाला धारेवर धरले.
रविवारी रात्री ब्राम्हणी बस स्टॅन्ड परिसरात तरुणांच्या दोन गटात वाद झाला. काल सोमवारी सकाळी 10 वाजता गावकरी एकत्र आले. जो पर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकारी येत नाही तो पर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर पोलिस निरीक्षक संजय ठेगे ब्राम्हणीत दाखल झाले. अनेकांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करत अवैध व्यवसाय व पोलिस प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांचे अवैध व्यवसायाकडे पूर्ण दुर्लक्ष असून पोलिस कर्मचारी व अवैध व्यावसायिक एकाच गाडीवर फिरत असल्याचा जाहीर आरोप गावऱ्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर केला. यापूर्वी देखील अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी सर्वसामान्य कुटुंबातील सात ते आठ तरुणांना दमबाजी करून मारण्याचा प्रयत्न केला.
दिवसेंदिवस संबंधितांची हिम्मत वाढत असून गावात अशांतता आहे. पोलिसांनी वेळीच याकडे गांभीर्याने लक्ष दिले असते तर, अवैध व्यवसायिकांची हिंमत वाढली नसती याला जबाबदार वांबोरी बीट पोलिस कर्मचारीच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. कर्मचाऱ्याने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण पोलिस कर्मचाऱ्याची बोलती बंद झाली.
यावेळी सुरेश बानकर, रंगनाथ मोकाटे, विजय बानकर,माणिक तारडे, महेंद्र तांबे, प्रसाद बानकर, शेखर मोकाटे, शांताराम हापसे, संजय मोकाटे, विश्वनाथ हापसे, माऊली राजदेव, महेश हापसे, भानूआप्पा मोकाटे, सुभाष गोरे, उमाकांत हापसे, गणेश तारडे, बाबासाहेब गायकवाड, कृष्णा राजदेव, राजाबाबू हापसे, डॉ.काकासाहेब राजदेव, राम राजदेव, योगेश गोरे, राजेंद्र जाधव, गौरव हापसे, अजित मोकाटे, महेद्र हापसे, महेश मोकाटे, सिराज इनामदार आदींनी चर्चेत भाग घेतला.
ब्राम्हणी गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्यास कारणीभूत कोण? याची जाहीर पोलखोल ग्रामस्थांनी केली. ब्राह्मणी गावातील अवैध व्यवसाया विरोधात याच क्षणापासूनच स्वतः लक्ष घालून संबंधितांना हद्दपार करणार असल्याची ग्वाही देत रात्रीच्या वादातील दोषींवर कारवाई करण्याचा इशारा पीआय संजय ठेंगे यांनी ग्रामस्थांसमोर दिला.
माध्यमिक शाळेसमोर टारगट तरुण मुलींना त्रास देत असल्याचे पालकांनी सांगितले. गावातील चर्चेनंतर पोलिस प्रशासन व पालकांनी शाळेत जावून शाळा प्रशासनाशी संवाद साधला. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या. शाळेच्या बाहेर मुलींच्या सायकली पार्किंग न करता त्या शाळेतच लावण्याच्या सूचना मुख्याध्यापक जाधव यांना केल्या. यापुढे कोणत्या क्षणी पोलिसांची गाडी शाळा परिसरात फिरताना दिसेल. शाळेशी संबंध नसलेला व्यक्ती आढळल्यास कडक कारवाई केली जाईल.असा इशारा पीआय ठेगें यांनी दिला. यावेळी उपनिरीक्षक गणेश वाघमारे, कर्मचारी सुनील निकम, ज्ञानेश्वर ठोंबरे आदी उपस्थित होते.