

अकोले: कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे अकोले येथील शिवाजी चौकात नुकतेच सामूहिक वाचन करण्यात आले.
बळीराजा अभ्यास मंडळ व समविचारी संस्था आणि संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज मंगळवारी हा उपक्रम पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी अकोले महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. किरण जाधव यांनी ऐतिहासिक संदर्भांसह प्रास्ताविक करत उपक्रमाची दिशा स्पष्ट केली. अलीकडेच या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आ. संजय गायकवाड यांनी अवमानकारक भाषा वापरून धमकी दिल्याची घटना घडली होती.
या पार्श्वभूमीवर राज्यभरात संताप व्यक्त होत असून, ठिकठिकाणी या पुस्तकाचे सामूहिक अभिवाचन केले जात आहे. अकोले येथेही या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अभिवाचन करण्यात आले. यावेळी प्रा. चंद्रशेखर हासे, तेजस्विनी माघाडे, विजया पाडेकर, डॉ. संदीप कडलग, प्रा. डॉ. महेजबीन सय्यद, आशिष पडवळ, सुनीता रूपवते, प्रा. महेश पाडेकर, स्वरा वैद्य, गणेश ताजणे, अनिकेत वैद्य, प्रतिक वाकचौरे, क्रांती रेवगडे, शिवशाहीर डॉ. मुकुंदा भोर, प्रा. बाळासाहेब मेहेत्रे तसेच अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त गिरजा जाधव यांनी अभिवाचनात सहभाग घेतला.
आ. डॉ. किरण लहामटे यांच्या अभिवाचनाने सांगता झाली. शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर यांनी आभार मानले. तर प्रा. डॉ. संदेश कासार यांनी सूत्रसंचालन केले. उपक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अजित नवले, डॉ. विजय भगत, रवी रूपवते, अच्युत वैद्य, अनिल मोहिते, अनिकेत घुले, विशाल शिंदे, गणेश पवार आदींनी परिश्रम घेतले.