

नगर: बचतीची सवय, बँकेकडून कर्जाची साथ आणि आत्मविश्वासाने सुरू केलेल्या व्यवसायाची जोड मिळाल्याने जिल्ह्यातील तब्बल १ लाख ८० हजार महिलांनी आपल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक करण्यात यश मिळवले आहे. या महिलांनी पारंपरिक चूल-मुलाच्या चौकटीबाहेर पडत शेतीतील पीक पद्धतीत बदल करण्यापासून कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, ब्युटी पार्लर अशा विविध व्यवसायांना सुरुवात केली. त्यामुळे जिल्ह्यातील महिला आता केवळ बचत गटाच्या सदस्य राहिल्या नसून ‘लखपती दीदी’ म्हणून नवी ओळख निर्माण करीत आहेत.
जिल्ह्यात सध्या सुमारे ३१ हजार महिला बचत गट कार्यरत असून, प्रत्येक गटात किमान दहा महिला असतात. या माध्यमातून तीन लाखांहून अधिक महिला बचत गटांच्या चळवळीशी जोडल्या गेल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने बचत गटांच्या माध्यमातून कर्जपुरवठा आणि व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शनावर भर दिला आहे.
वर्षात 11 हजार गटांना 503 कोटींचे कर्ज
महिलांच्या उद्योग-व्यवसायाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील बचत गटांना तब्बल १३२२ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला. गतवर्षीच ११ हजार ७० गटांना ५०३ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले. या कर्जाचा वापर महिलांनी केवळ दैनंदिन गरजांसाठी न करता उत्पन्नवाढीच्या साधनांमध्ये केल्याचे सांगितले जाते.
कर्ज, व्यवसाय अन् उत्पन्नवाढ
बचत गटांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या कर्जामुळे ग्रामीण महिलांच्या हाताला भांडवल मिळाले. त्यातून अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. काहींनी शेतीमध्ये गुंतवणूक करून उत्पादन वाढविले, तर काहींनी पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप दिले. किराणा दुकान, ब्युटी पार्लर यांसह विविध छोटे-मोठे व्यवसाय उभारून महिलांनी कुटुंबाच्या उत्पन्नात भर घातली. महिला कर्जाची परतफेड करणाऱ्या उद्योजक बनल्या.
‘उमेद’ची डिजिटल नजर
बचत गटांच्या आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवण्यासाठी उमेद अभियानातील सीआरपी (समुदाय संसाधन व्यक्ती) महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सीआरपीकडून दर महिन्याला ॲपच्या माध्यमातून बचत गट आणि त्यातील महिलांच्या कर्जवाटप, परतफेड तसेच आर्थिक व्यवहारांचा आढावा घेतला जातो. याच आधारावर ‘लखपती दिदी’चा दावा केला जात आहे. प्रकल्प संचालक मंजूषा ठवकर, अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप हे मार्गदर्शन करत आहेत.
यावर्षी तयार करणार २०८८७ गट
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी २०२६-२७ या वर्षात आणखी २०,८८७ नवीन महिला बचत गट स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या माध्यमातून मोठ्या संख्येने महिलांना बचत गटाच्या चळवळीशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. देशभरात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचे कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्याच्या ‘लखपती दीदी’ अभियानाला या उपक्रमामुळे ग्रामीण भागात मोठी चालना मिळत आहे.