नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची सक्तीची कर्जवसुली बंद करावी तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकरी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. दि. १८ डिसेंबरपासून हे आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीने दिली.
शेतकरी संघर्ष समितीतर्फे दि. १ जून २०२३ पासून जिल्हा रुग्णालयासमोर उपोषण सुरू आहे. जिल्हा बॅंकेची कारवाई, सहकार कायदा 1960 चे कलम 101, 107 व 100, 85 च्या सुरू असलेल्या कारवाईसह सातबारा काेरा करावा आदी मागण्या यात करण्यात येत आहेत. मात्र, शासन स्तरावर याबाबत कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. पावसाळी अधिवेशनावेळीही एक शिष्टमंडळ मुंबई येथे जाऊन विविध मंत्र्यांची भेट घेऊन आले. पण तेथे कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात निवेदन दिले. १६१ दिवसांनंतरही यासंदर्भात कोणतीच दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे येत्या १८ डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावेळी अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.
नाशिक व नागपूर येथे प्रत्येकी एक शिष्टमंडळ आंदोलन करेल, अशी माहिती शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोरोडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल व आदिवासी संघर्ष समितीचे कैलास बोरसे यांनी दिली.
हेही वाचा :