Onion News : कांदा भाव स्थिरतेसाठी विकणार बफर स्टॉक
कांद्याच्या दरात ६० टक्क्यांहून अधिकने वाढ झाल्याने केंद्राने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शुक्रवारी (दि.27) किरकोळ बाजारातील कांद्याची विक्री ‘बफर स्टॉक’मधून 25 रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने करण्याचा निर्णय घेतला. ग्राहक व्यवहार मंत्रालय नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून २ लाख टन कांदा किरकोळ बाजारात आणणार आहे. हा कांदा २५ रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने विकले जाणार आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून देशभरात कांद्याच्या भावात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. १४ ऑक्टोबर रोजी लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला २८७० रुपये भाव मिळाला होता. मात्र, गेल्या बारा दिवसांत आवक मंदावल्याने कांद्याच्या दरात ६५ % ने वाढ होत ५८६० रुपयांचा दर मिळाला आहे. त्यामुळे कांद्याच्या भाव नियंत्रणासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. नवीन खरीप कांदा अजून एक महिन्यानंतर बाजारात येण्याची शक्यता आहे. म्हणजेच डिसेंबरपर्यंत कांद्याचे दर वाढतच राहण्याची शक्यता आहे. कांद्याला समाधानकारक भाव मिळत असून, कांदा उत्पादकाला आनंद होता. मात्र, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधून कांद्याची किरकोळ बाजारात २५ रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे याचा फटका बाजारभावावर होतो का? हे लिलावानंतर स्पष्ट होईल.
हेही वाचा ;