Nashik News : द्राक्षबागांवर डावण्या रोगाचा प्रादुर्भाव
नाशिक : पुढारी वृत्तसेवा l हवामान बदलाचा फटका आता द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. उष्ण व दमट हवामानामुळे द्राक्षबागांवर डाऊनी (डावण्या) रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सध्या हवामानबदलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रथमत: डाऊनी हा रोग द्राक्षबागांच्या पानावर व घडावर येत असतो. यामध्ये पानावर आल्यावर पान पूर्ण गोळा होऊन खराब होते. डाऊनी द्राक्षबागेच्या घडावर आल्यानंतर घड पूर्ण गोळा होऊन खराब होतो. हा रोग पानावर आल्यावर शेतकऱ्यांना द्राक्षाची पाने तोडून टाकावी लागतात. कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. त्याचप्रमाणे या रोगामुळे घड तोडून टाकावे लागतात. त्यामुळेच हा रोग धोकादायक मानला जातो.
रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे.
डावण्या हा रोग संसर्गजन्य असल्याने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रादुर्भाव वाढल्यास संपूर्ण बाग उद्ध्वस्त होण्याची भीती असते. काही भागांत संसर्ग आढळला आहे. त्यामुळे नियोजनाप्रमाणे उपाययोजना केल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करू नये.
-बबलू शंखपाळ, द्राक्षबागायतदार, कारसूळ, ता. निफाड
हेही वाचा :