जळगाव : कापूस, कांद्याला हमीभाव तर केळी उत्पादकांना नुकसान भरपाई द्या : राष्ट्रवादीचे धरणे
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
कापसाला किमान १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव तर कांद्याला किमान ३ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा. तसेच सीएमव्ही रोगामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनप्रसंगी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, आमदार अनिल पाटील, महिला आघाडी अध्यक्ष मंगला पाटील, वंदना चौधरी, नामदेव चौधरी, वाल्मीक पाटील, रमेश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या आहेत मागण्या…
कापसाला किमान १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा. कांद्याला किमान रु ३ हजार रुपये हमी भाव देण्यात यावा. सीएमव्ही रोगामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतक-यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये प्रमाणे मदत मिळावी. नियमीत कर्जफेड करणा-या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान तत्काळ मिळावे. रासायनीक खते व बियाण्यांचे दर कमी करण्यात यावे. घरगुती गॅस ची दरवाढ कमी करावी. पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी करण्यात यावा. जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावे. महावितरणकडून शेतक-यांची विज तोडणी तत्काळ थांबवावी. शेती पंपांना १२ तास सुरळीत विज देण्यात यावी. जळगाव जिल्ह्यातील विशेषत: जळगाव शहरातील रस्ते तत्काळ सुधारण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.