अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गावर वाहतुकीस अडथळा आणणार्‍या चौघांना अटक | पुढारी

अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गावर वाहतुकीस अडथळा आणणार्‍या चौघांना अटक

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : आयशर ट्रकच्या काचा फोडण्याचा प्रकार घडल्याने संतप्त झालेल्या चारजणांनी ट्रक आडवे लावून अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गावरील वाहतूक आडविली. गुजरात सीमेलगतच्या गुलीउंबर आरटीओ तपासणी नाक्याजवळ हा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास घडला. अक्कलकुवा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पहाटे वाहतूक सुरळीत केली. परंतु, आयशर ट्रकच्या काचा कोणत्या कारणाने फुटल्या? आणि या घटनेचे मूळ कारण काय? हे मात्र गुलदस्त्यात आहे.

समाधान गोपाल निकम ( रा. भामरूड राणीचे, ता. पाचोरा, जि. जळगाव) श्रीकृष्ण विठ्ठल बिरारी, योगेश शालीग्राम बावीस्कर (रा. पाळधी, ता. धरणगाव जि. जळगाव) आणि दिलीप प्रभाकर माळी (रा. पाळधी दोणगाव ता. धरणगाव जि. जळगाव) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर ट्रकने बुधवारी (दि. १ डिसेंबर २०२१) च्या मध्यरात्री अंकलेश्वर – बऱ्हाणपूर महामार्गावरून हे चौघे जात होते. तेव्हा हायवेवर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गुजरात सीमेलगत असलेल्या गुलीउंबर शिवारात आरटीओ चेक पोस्टजवळ ते थांबले होते. याच दरम्यान गुजरात हद्दीच्या बाजूने असलेल्या एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या त्यांच्या आयशर (क्र. एमएच- १९ सीवाय- ५५५६ आणि एमएच – १९ सीवाय २४०३ ) या दोन्हीही ट्रकच्या काचा कोणीतरी अज्ञातांनी फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावरून संतप्त्त झालेल्या या चौघांनी चेक पोस्ट नाक्यावरील पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. यात काचा फोडणाऱ्यांना त्वरित शोधून अटक करा, असा आग्रह तिथे उपस्थित पोलिसांकडे त्यांनी केला.

संबंधित अधिकाऱ्यांनी याआधी संबंधित पोलीस ठाण्यात जावून फिर्याद दाखल करा, मग पुढील कारवाई करता येईल, अशी समजूत संबंधित अधिकाऱ्यांनी काढली. परंतु, समाधान झाले नसल्यामुळे या संतप्त चौघांनी आपले दोन्ही आयशर ट्रक थेट रस्त्यावर आडव्या लावून वाहतुकीस अडथळा आणला. यामुळे शेकडो ट्रक रस्त्यावर खोळंबून होते.

तीन राज्यांना जोडणारा महामार्ग असल्यामुळे जड वाहने व प्रवासी वाहने या महामार्गावरून जात असतात. या दोन ट्रक आडवे लावल्यामुळे वाहतूक खोळंबून राहिली. भर पावसात रात्रीच्या साडेबारा वाजल्यापासून पहाटे साडेतीनपर्यंत हे नाट्य या महामार्गावर चालू होते. अखेर अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अविनाश रंगाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या चारही जणांविरुद्ध बेकायदेशीर प्रतिबंध केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

दोन्ही आयशर ट्रक- महामार्गावर आडव्या लावल्याने जाणारे- येणारे वाहनांना जाण्या- येण्यासाठी प्रतिबंध केला, दोन्ही बाजुची वाहतूक काेंडी करून तेथे लोकांची गर्दी जमा केली, तसेचजमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलीस नायक देवीदास विसपूते करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button