नाशिक शहरात आजपासून 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दि. १४ ते २८ जुलै दरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहरात मनाई आदेश लागू केले आहेत.
राज्यातील राजकीय घडामोडींमुळे सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्याचप्रमाणे सण-उत्सवांत भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्ष, गट यांच्याकडून मोर्चे, निदर्शने, बंद पुकारणे, आंदोलने केली जातात. या पार्श्वभूमीवर शहरात शांतता कायम राहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी आयुक्त शिंदे यांनी १५ दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू केले आहेत.
त्यानुसार नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाहीत. दगड, शस्त्र, लाठ्या, बंदुका बाळगता येणार नाहीत. कोणत्याही व्यक्तीच्या प्रतीकात्मक प्रेताचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करता येणार नाही. आरडाओरड, वाद्य वाजवण्यास बंदी असेल. प्रक्षोभक भाषण, वर्तणुकीस बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, पेढे वाटणे, फटाके फोडणे, घंटानाद करणे, शेरेबाजी करण्यासही बंदी घातली आहे. पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा पाचहून अधिक नागरिकांना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारे महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र राहतील, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
हेही वाचा :