नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शॉपिंगला गेल्यानंतर, पार्सल फूड घेतल्यानंतर ट्रेन्डी कागदी बॅग हातात दिसतात. प्लास्टिक बंदीनंतर आता पेपर बॅगचे महत्व वाढले असून एकट्या नाशिकमध्ये ९० टन कागदी बॅगची निर्मिती होते. २०१८ मध्ये राज्य सरकारने एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणली होती परंतु कोविड काळात ती मोहीम काही काळापुरता स्थगित केली होती. २०१८-२०२२ कालावधीत भारतात ३.६ लाख दशलक्ष टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला. जमा होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यापैकी ५० टक्क्यांपेक्षा कमी पुर्नवापर केला जातो. त्यामुळे प्लास्टिक बंदीनंतर कागदी उत्पादनाच्या व्यवसायात वाढ व्हायला लागली आहे.
भारतातील पॅकेजिंग उद्योग हा अर्थव्यवस्थेतील पाचव्या क्रमांकावरचा सर्वात मोठा व्यवसाय आहे. देशातील वाढीव क्षेत्रांपैकी हे एक क्षेत्र मानले जाते. पॅकेजिंग इंडस्ट्री असोसिएशन इंडियाच्या मते, हे क्षेत्र वर्षाला २२ ते २५ टक्क्यांनी वाढत आहे. नव्वदच्या दशकापासून पाश्चिमात्य देशांमध्ये कागदी बॅग वापरण्याचे प्रमाण वाढले व आजच्या घडीला पेपर बॅग वापरणे तिथली संस्कृती झाली आहे. त्या तुलनेने भारतात त्याचे प्रमाण कमी आहे.
बॅग बनवण्यासाठी लागणारा पेपर रोल स्थानिक मिलमधून तर फूड ग्रेड पेपर मुंबईहून मागिवला जातो. मूळात फूड ग्रेड मटेरियल बनवणाऱ्या मिल गुजरात, दिल्ली सारख्या भागात जास्त आहेत. तिथून अॅार्डर करायला परवडत नाही. पेपर बॅग बनविणारी अॅाटोमॅटिक मशीन ८ लाख ५० हजार रूपयांना येते आणि तितक्याच किंमतीचा कच्चा माल हा व्यवसाय उभारण्यासाठी लागतो. यामध्ये महिलांना आठ तासाचे ३०० रूपये उत्पन्न मिळते.
पेपर बॅगचे वैशिष्टे
पेपर बॅग या १०० टक्के रिसायकल होतात. त्यामुळे त्या पर्यावरणपूरक असतात.
खाकी आणि पांढऱ्या अशा दोन रंगात या बॅग तयार केल्या जातात.
शिवाय लिक प्रुफ आणि वॉटर प्रुफ असतात.
कागदाचा वास येत नाही. पेपर बॅगमध्ये कॅटगिरी असतात.
अन्नपदार्थ ठेवण्यासाठी फूड ग्रेड बॅग ; शॉपिंग बॅग नॉन फूड ग्रेड बॅग
काय आहे शिक्षा..
प्लास्टिक बंदी २०२२ नियमानुसार उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांनी नियमभंग केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६च्या कलम ९ अन्वये कारवाई होते. त्यात पहिल्या गुन्ह्यासाठी ५ हजार, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार, त्यानंतर तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास व २५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येतो.
प्रतिक्रिया
प्लास्टिक बंदी होण्याच्या आधीपासून पेपर बॅगच्या व्यवसायात आहे. प्लास्टिक बंदीनंतर पेपर बॅगला मागणी वाढली आहे. वाईन शाॅप, स्विटमार्ट, शॉपिंग मॉल सारख्या ठिकाणी आता पेपर बॅगच वापरल्या जातात. अॅाटोमॅटिक मशीनमुळे मनुष्यबळ कमी लागते फक्त कस्टमाईज बॅग असतील तर त्या महिलांना बनवायला दिल्या जातात.
-सचिन सोनवणे, पेपर बॅग व्यावसायिक
हेही वाचा :