Nashik : उन्हाच्या तीव्र झळांनी नाशिककर त्रस्त
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर परिसरात उष्णतेची लाट कायम असून, तीन दिवसांपासून पारा ३७.५ अंशांवर स्थिरावला आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी नाशिककर त्रस्त झाले आहेत. तर ग्रामीण भागातील जनजीवनावरही उकाड्याचा परिणाम जाणवतो आहे.
राज्यभरात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे जीवाची लाहीलाही होत आहे. नाशिक शहराचा पारा ३७ अंशांपलीकडे कायम असल्याने तीव्र उकाड्यामुळे घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी १० पासून उन्हाची तीव्रता जाणवत असून, दुपारी १२ ते ४ यावेळेत सर्वाधिक चटका बसतो. परिणामी शहरवासीय या कालावधीत घराबाहेर पडण्याचे धाडस करत नाहीत. त्याचवेळी उष्णतेमुळे रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याची वेळ ओढावत आहे. उष्णतेपासून बचावासाठी एसी, पंखे, कूलरची मदत घेतली जातेय.
ग्रामीण भागावरही सूर्य कोपला आहे. हवेतील उष्णलहरींमुळे ग्रामीण जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. तर उन्हाचा तडाखा बघता शेतकरी बांधव पहाटेच्या वेळी किंवा सायं. ४ नंतर शेतीच्या कामांना प्राधान्य देत आहेत. दरम्यान, पुढील काही दिवस नाशिकसह राज्यभरात उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना दुपारची वेळ टाळावी. तसेच कामासाठी जाताना टोपी, रूमाल तसेच महिलांनी स्कार्फ परिधान करावा. सोबत पाण्याची बाटली ठेवावी. याशिवाय शेतकरी बांधवांनी उन्हापासून जनावरांची काळजी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :