नाशिक : 'समृध्दी'चा दुसरा टप्पा मेअखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा मे अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार आहे. शिर्डी ते भरवीर खुर्द (इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले असून, लवकरच या टप्प्यातील महामार्गावर वाहने धावताना दिसणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीने लोकार्पणाची तयारी सुरू केली आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास शिर्डी ते भरवीर अंतर ४०-४५ मिनिटात वाहनधारकांना कापता येणार आहे.
राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांना जोडणारा ७०१ किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे. या मार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटरचा मार्ग डिसेंबर २०२२ मध्ये सुरू करण्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यापाठापोठा शिर्डी ते भरवीर हा ८० किमीच्या टप्प्याचे १०० टक्के काम पूर्ण झाल्याने हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे भरवीर ते नागपूर हे ६०० किलोमीटरचे अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे. समृध्दी महामार्गाचा शिर्डी ते भरवीर टप्पा मार्च महिन्यातच पूर्ण करण्याचे टार्गेट होते. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे या कामास विलंब झाला होता. एप्रिल महिन्यात या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, तेव्हापासून हा मार्ग लोर्कापणाच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एमएसआरडीसी खात्याची धुरा आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून उदघाटनाची तारीख निश्चित केली जात असल्याने ८० किमीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्यास विलंब होत असल्याची चर्चा आहे.
समृध्दी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर हा ८० किमीच्या टप्प्याचे बांधकाम पुर्ण झाले असून, हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन सुरू आहे. मे अखेरपर्यंत या मार्गाचे लोर्कापण होईल. या टप्प्यावरील वाहतूक सुरू झाल्यानंतर मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. -विजयकुमार कोळी, कार्यकारी अभियंता (समृध्दी महामार्ग).