नाशिक : डीएडने मारलं पण कुक्कुटपालनाने तारलं! | पुढारी

नाशिक : डीएडने मारलं पण कुक्कुटपालनाने तारलं!

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

डीएड करून आपण शिक्षक होऊ आणि आलेल्या पगारात आपण आपल्या कुटुंबाला हातभार लावू, असे स्वप्न पाहता पाहता आयुष्यातील तब्बल १० वर्षे खर्च झाली. परंतु शिक्षक भरती मात्र काही करता निघण्यास तयार नाही. सरते शेवटी सरकारवर अवलंबून न राहता. स्वतःचा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आणि रोजी रोटीला लागला. अशीच काहीशी करुण कहाणी एका बेरोजगार असलेल्या भावी शिक्षकाची आहे. ती ऐकून कोणाच्याही काळजाला पाझरही फुटेल आणि प्रेरणाही मिळेल.

संदीप सदाशिव कचरे या सापगावातील (त्रंबकेश्वर) तरुणाची ही कहाणी खरोखर अविश्वसनीय आहे. एम. ए. असून, संदीप सुशिक्षित बेरोजगार आहे. डीएड होऊन १० वर्षे झाली असून, अद्यापही नोकरीच्या प्रतीक्षेत होताे. शेवटी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असे त्याला वाटले आणि स्वतःच्या हिमतीवर कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. कसलेही मार्गदर्शन आणि कसलीही मदत नसताना हा व्यवसाय सुरू केला आणि आज तो स्वतःच्या पायावर उभा आहे. आज डीएड होऊन त्याला १० वर्षे झाली असून, शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहे. त्याला नोकरी मिळाली नाही. सरतेशेवटी त्याने दोन वर्षांपूर्वी स्वतःचा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला असून, तो कुटुंबाचे पालन पोषण करेल इतपत कमावून घेत आहे. आपल्या मदतीला कोणी येणार नाही. आपल्यालाच करायचे आहे, एवढा निश्चय मनाशी ठरवून कामाला लागा, असे त्याचे बेरोजगारांना सांगणे आहे.

सुरुवात शंभर कोंबड्यांपासून
कुक्कुटपालनास सुरुवात १०० कोंबड्यांपासून केली. १०० पक्ष्यांच्या शेडसाठी १० हजार रुपये, पक्षी विकत घेण्यासाठी २,५०० ते ३,००० रुपये, खाद्यासाठी साधारण पाच हजार रुपये खर्च लागतो. सहा महिन्यांनंतर अंडे उत्पादन चालू होते. १०० कोंबड्यांमागे दररोज ४० ते ५० अंडी मिळतात. त्यानुसार आपला रोज चालू होतो. साधारण दीड ते दोन वर्षांपर्यंत कोंबडी अंडे देते. असे सर्वसाधारण या व्यवसायाचे स्वरूप असते. ते सर्वांनी करावे, नक्की यश येईल आणि कुटुंब चालवणे सोपे होईल, असा संदीप यांचा सल्ला आहे.

सुशिक्षित बेरोजगारांनी हार न मानता आपल्या ज्ञानाचा, आपल्या कौशल्याचा उपयोग व्यवसायामध्ये दाखवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे धाडस करावे.  संदीप कचरे, व्यावसायिक (कुक्कुटपालन), डीएड, एम.ए, त्र्यंबक.

हेही वाचा:

Back to top button