Sanyogeetaraje Chhatrapati : वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा मज्जाव; संयोगीताराजे छत्रपती यांची पोस्ट चर्चेत | पुढारी

Sanyogeetaraje Chhatrapati : वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा मज्जाव; संयोगीताराजे छत्रपती यांची पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात काल (दि.३०) रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती (Sanyogeetaraje Chhatrapati) यांनी नाशिक जिल्हयातील काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी पूजाऱ्यांनी मंदिरात पूजा पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यावर संयोगिताराजे यांनी त्याला विरोध करून वेदोक्त पद्धतीने पूजा करण्यास सांगितले. त्यावर तेथील महंतांनी संयोगिताराजे यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केला. या घटनेनंतर संयोगिताराजे यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत महंतावर आरोप करत म्हंटलं आहे की, ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही. वाचा सविस्तर बातमी. 

Sanyogeetaraje Chhatrapati

 Sanyogeetaraje Chhatrapati : काय लिहिलं आहे संयोगीताराजे छत्रपती यांनी

हे श्रीरामा,

स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या, परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धि दे.
“हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे,
माणसाने माणसाशी माणसासम वागणे”
आपण सर्वजण देवाची लेकरे आणि लेकरांना आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी? या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक, असे निर्णय घेतले होते. त्यांचा वैचारिक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले. नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच. तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा सुद्धा म्हटली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे.

परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही. अस लिहित संयोगीताराजे छत्रपती यांनी केलेल्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या पोस्टची चर्चा होत आहे.

हेही वाचा 

Back to top button