नाशिकची वाटचाल क्राइम कॅपिटलकडे; माजी मंत्री छगन भुजबळांनी वेधले लक्ष | पुढारी

नाशिकची वाटचाल क्राइम कॅपिटलकडे; माजी मंत्री छगन भुजबळांनी वेधले लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहराची पौराणिक शहर म्हणून असलेली ओळख वाढत्या गुन्हेगारीमुळे बदलत असून, नाशिक आता क्राइम कॅपिटल होत आहे. नाशिकच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पावरील मागण्यांवर चर्चा करताना नाशिकच्या गृह, उद्योग, ऊर्जा, जलसंपदासह विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले.

भुजबळ म्हणाले, शहर क्राइम कॅपिटल झाले आहे. दर दिवसाआड खुनाची घटना समोर येत आहे. नाशिकमध्ये वर्षभरात 4,455 गुन्हे दाखल होऊन गुन्ह्यांच्या चढत्या आलेखामुळे आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. सिडको परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये वाढ होत असून, नवनवीन टोळ्या उदयास येत आहेत. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढून दहशत निर्माण झाली आहे. महावितरणच्या विषयावर म्हणाले, येवला मतदारसंघातील मरळगोई, खडक माळेगाव, बल्हेगाव या नवीन विद्युत उपकेंद्रांचे प्रकरण चीफ इंजिनियरने महावितरण संचालकांकडे पाठविले आहे. मात्र सहा महिने होऊन त्यावर निर्णय होत नाही. त्याचबरोबर कुसूर, सोमठाण देश येथे नवीन विद्युत उपकेंद्र व येवला शहर आणि कोटमगाव येथे अतिरिक्त ट्रान्स्फॉर्मर बसविणे प्रस्तावित आहे. ही कामे तातडीने करण्यात यावीत. तसेच आरडीएसएस आणि एसीएफमधील कामांची निविदा प्रक्रिया राबवून ही कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

एमआयडीसी पोलिस ठाणे व्हावे
अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून नवीन एमआयडीसी पोलिस ठाणे निर्माण करण्याची शासनाकडे आम्ही मागणी केलेली आहे. गृहविभागाने या प्रस्तावाला ताबडतोब मान्यता देऊन, नाशिकवरील ताण पाहता नवीन पोलिस ठाण्याला मंजुरी द्यावी. पोलिस आयुक्तालयाची हद्दवाढ आणि पोलिस ठाण्यांच्या विभाजनाला लवकर मंजुरी दिली पाहिजे. तसेच पोलिस मनुष्यबळ वाढविण्यात यावे, अशी मागणी केली.

हेही वाचा:

Back to top button