Dada Bhuse : राऊतांचे धमकी प्रकरण प्रसिद्धीचा केविलवाणा प्रयत्न
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कायदेशीर मांडणी केल्याने आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळाले. सर्वोच्च न्यायालयातही आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. खासदार संजय राउत यांचे धमकी प्रकरण हे प्रसिद्धीचा केविलवाणा प्रयत्न आहे. मुंबईची एजंटगिरी करण्यासाठी ते नाशिकला येत असतील, अशा शब्दांत भुसे यांनी राउतांवर निशाणा साधला.
ना. भुसे यांनी शुक्रवारी (दि.२३) नाशिकमध्ये महावितरणची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रेच्या सुनावणीबाबत त्यांना विचारले असता लोकशाही प्रक्रियेत सर्वांनाच न्याय मागण्याचा अधिकार आहे. आपला देश घटना, नियम आणि कायद्यावर चालतो. न्यायालयामध्ये कायद्यानुसार न्यायनिवाडा होत आम्हाला न्याय मिळेल, असे भुसे म्हणाले. लोकशाही प्रक्रियेत संख्येला अधिक महत्त्व आहे. त्यानूसार खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची संख्या आमच्याकडे जास्त आहे. त्या आधारावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय केल्याचे भुसे यांनी सांगितले.
राउतांची कीव येते
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत यांनी माणसे फोडण्यासाठी एजंट नेमल्याचा आरोप केला होता. त्याबाबत भुसे यांचे लक्ष वेधले असता राउतांची मला कीव येते. ते स्वत:च कदाचित मुंबईची एजेंटगिरी करण्यासाठी नाशिकला येत असतील, अशीही टीका भुसे यांनी केली. राउत यांच्या धमकी प्रकरणावर मुख्यमंत्री यांनी चाैकशीची घोषणा केली असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :