जिल्हा परिषद : सीईओ अशिमा मित्तल यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; धक्कादायक परिस्थिती पाहून झाल्या संतप्त | पुढारी

जिल्हा परिषद : सीईओ अशिमा मित्तल यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; धक्कादायक परिस्थिती पाहून झाल्या संतप्त

नाशिक (नगरसुल) : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद सीईओ अशिमा मित्तल व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी अचानक भेट दिली. या उपकेंद्रात अनेक सोईसुविधा उपलब्ध नसल्याचे धक्कादायक परिस्थिती आढळून आल्याने त्या संतप्त झाल्या आहेत.
आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार पाहून मित्तल यांनी संताप व्यक्त केला. गेल्या दोन वर्षापासून राजापूर व परिसरातील लोकांना ग्रामीण सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, आरोग्य केंद्राची इमारत पावसाळ्यात गळत असून येथील ऑपरेशन थिएटर, डिलिव्हरी रूम उपलब्ध असून त्यात आवश्यक सोईसुविधांची वाणवा आहे. आरोग्य केंद्रात पाण्याची व्यवस्था नाही. एक वर्षापासून येथील आरोग्य केंद्रात एकही डिलिव्हरी झालेली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.  ओपीडी परिचारिकापद तसेच औषध निर्माता कर्मचारी पद रिक्त आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून रुजू झालेले राठोड नामक वैद्यकीय अधिकारी रजेवरच असल्याने इतर वैद्यकीय अधिकारी कुंटे यांच्यावर संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी सध्या आहे. हे दोन्ही अधिकारी रात्रपाळीला प्राथमिक आरोग्य केंद्रात राहत नाहीत. दुपारी तीन चार वाजेनंतर एकही कर्मचारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध राहत नाहीत. रात्रपाळीला  परिचारिका उपलब्ध नसतात. अशा विविध समस्यांनी येथील उपकेंद्र वेढले गेले असून गेल्या कित्येक दिवसापासून अडचणी भेडसावत असल्याने संबंधित कर्मचारी सुध्दा त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे शिव नावाच्या कर्मचा-याने सांगितले. आठ दिवसात येथील आरोग्य केंद्राची सुधारणा झाली नाही तर पुढील कार्यवाही करण्याचा इशारा मित्तल यांनी दिला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील दफ्तराची तपासणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी केली असता बरेच दफ्तर हे अपूर्ण अवस्थेत असून कोणताच ताळमेळ होत नसल्याचे दिसून आले. तसेच ग्रामीण भागातील  बऱ्याच रुग्णांना बाहेरूनच औषधोपचार करण्यासाठी कर्मचारी आरोग्य केंद्रातून परस्पर पाठवत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. त्या संदर्भात मित्तल यांनी स्वत: पडताळणी केली. त्याबाबत सत्यता आढळल्याने मित्तल यांनी कर्मचा-यांवर संतापाचा सूर आवळला. अधिकारी, कर्मचारी यांचा मनमानी कारभार पाहून मित्तल यांनी सर्व कर्मचा-यांना धारेवर धरले.
याप्रसंगी येवला तालुका शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अण्णासाहेब मुंडे यांनी अनुपस्थित राहणा-या वैद्यकीय अधिकारी राठोड यांची बदली करण्याची मागणी केली. तसेच समता जिल्हा परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे यांनी इमारत गळती व इतर समस्या उपलब्ध नसल्याची तक्रार माजी उपसरपंच सुभाष वाघ यांनी केली आहे. अचानक दौऱ्यामुळे अधिकारी कर्मचारी यांची एकच धावपळ उडाली. यावेळी येवला पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी अन्सार शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कुलकर्णी, अण्णा मुंडे, ज्ञानेश्वर दराडे, पोपट आव्हाड, सुभाष वाघ, प्रमोद बोडके, रामभाऊ केदार, सरपंच वंदना आगवन, शरद आगवन, दत्ता सानप, लक्ष्मण घुगे, योगेश गंडाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी शरद काकडे, ग्रामविकास अधिकारी आर. एस. मंडलिक व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button