एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? गिरीश महाजनांनी सांगितलं गुपित
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर एकनाथ शिंदे बाहेर पडताच ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. 40 ते 50 आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्यानंतर राज्यात नवे सरकार स्थापन झाले. परंतु या साऱ्या खेळीमागे भाजपने पडद्याआडून सूत्रे कशी हलवित होते, याचे गुपित मंत्री गिरीश महाजन यांनी आज उघड केले.
पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचे महाधिवेशन पार पडले. या कार्यक्रमात बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेत पडलेली फूट, एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा नेमका प्रवास कसा झाला, हे सारे उलगडून दाखविले. यावेळी गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले? या गोष्टीचा विचार केला तर आम्हालाही विश्वास बसत नव्हता. मात्र ऑपरेशन सुरू केले. एकनाथ रावजी पुढे निघाले, ते पुढे गेले आणि बघता बघता त्यांचे सर्व सैन्य त्यांच्या मागे गेले आणि शेवटी जमलं सारं… जुळून आलं… घडून आलं, यामागे चामुंडा मातेचाही आशीर्वाद होता, असेही मंत्री महाजन म्हणाले.
कसे पार पडले मिशन?
हे सर्व मिशन एवढे सोपे नव्हते. शिवसेनेसारख्या पक्षातून ४० जण बाहेर पडतात, उद्धव ठाकरे यांना कंटाळून ते बाहेर पडतात. सतरा अठरा लोक घेऊन बाहेर पडायचं आणि पन्नासपर्यंत मजल गाठायची हे खूप अवघड होते. मध्येच मिशन फेल झाले तर काय करायचे असे वाटायचे, मात्र पुढारी कसे असतात तुम्हाला माहिती आहे, आम्ही कसे असतो तुम्हाला माहिती आहे. मात्र, लोक आले आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळे अनेकांचे आशीर्वाद शिंदे साहेबांच्या पाठीशी होते, अशीच लाट आली आणि एकनाथ शिंदे साहेबांना बाहेर घेऊन आली आणि थेट मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरच बसवले, असेही मंत्री महाजन यावेळी म्हणाले.
हेही वाचा :