पालकमंत्री भुसे : कालवे बंदिस्तीकरणाने वाढणार सिंचन क्षेत्र
मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
कर्नाटक राज्यातील रामथळ प्रकल्पांतर्गत एकाच यंत्रणेच्या देखरेखखाली 12 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचन झालेे. तर महाराष्ट्राच्या बोधखिंडी (ता. इस्लामपूर) या ठिबक सिंचन प्रकल्पांतर्गत 600 एकर क्षेत्र ओलिताखाली आले. याच धर्तीवर दहिकुटे व बोरी अंबेदरी प्रकल्पातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून शेतकर्यांचे हित साधण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे बंदरे आणि खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी केले. दहिकुटे व बोरी अंबेदरी मुख्य कालव्याचे बंदिस्त नलिकेद्वारे वितरण प्रणाली कामाचे भूमिपूजन पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते रविवारी झाले. हा शाश्वत, नावीन्यपूर्ण व पथदर्शी प्रकल्प यशस्वी करावा, असे आवाहन पालकमंत्री भुसे यांनी केले.
या गावांना होणार लाभ….
दहीकुटे प्रकल्पांतर्गत देवारपाडे, जळकू, झोडगे, चिखलओहोळ, दसाणे, दहिकुटे, माणके, सायने खुर्द या गावांचा, तर बोरी अंबेदरी प्रकल्पाअंतर्गत झोडगे, अस्ताणे, जळकू, वनपट, लखाणे, राजमाने, दहिदी, गाळणे, टिंगरी, या गावांचा समावेश आहे. बंदिस्त कालवा योजनेमुळे या गाव परिसरास सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.