नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषद प्रशासनाने दोन आठवड्यांपूर्वी 39 शिक्षकांना पदस्थापना दिल्या. मात्र, आंतरजिल्हा बदली करून नाशिक जिल्ह्यात आलेले 59 शिक्षक अद्याप रुजूच झाले नाहीत, या शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, आंतरजिल्हा बदली करून, 98 शिक्षक येणे अपेक्षित असताना, अवघे 39 शिक्षकच रुजू झाले आहेत.
दरम्यान, अनेक गावांमधील शाळांमध्ये अचानक शिक्षक कमी झाल्याने, शाळेत शिक्षक नसल्याने आता विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे होणार, असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे रिक्त जागांवर तत्काळ शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. जिल्ह्यातून 129 शिक्षक आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्ह्यांमध्ये बदलून गेले आहेत, तर 39 शिक्षक जिल्ह्यात रुजू झालेले आहेत. उर्वरित शिक्षकांना संबंधित जिल्ह्यांतून अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. रुजू झालेल्या शिक्षकांना शून्य शिक्षकी शाळांमध्ये प्राधान्यक्रमाने नेमणूक देण्यात आल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.
शिक्षण विभाग हतबल?
जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने येणार्या शिक्षकांपैकी हजर न झालेल्या शिक्षकांनी रुजू होऊन जिल्ह्यातील पत्ता अजूनही शिक्षण विभागाला कळविलेला नाही. त्यामुळे संबंधित शिक्षकांना नोटीस कुठे पाठवायची, असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे, तर दुसर्या जिल्ह्यातून कार्यमुक्त न झालेल्या शिक्षकांविषयीही शिक्षण विभाग हतबल असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.