नाशिक : सातपूर आयटीआय मध्ये प्रथमच पदवीदान दीक्षांत समारंभ | पुढारी

नाशिक : सातपूर आयटीआय मध्ये प्रथमच पदवीदान दीक्षांत समारंभ

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

ऑगस्ट 2022 मध्ये आयटीआय परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या एक वर्ष व दोन वर्षे कालावधीच्या विविध 27 व्यवसायातील प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या 81 प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा प्रथमच पदवीदान दीक्षांत समारंभ पार पडला.
नाशिक मधील औद्योगिक क्षेत्रात आयटीआय झालेल्या कौशल्यपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांना उज्ज्वल भविष्यातील मोठी संधी असून यासंबंधीचा फायदा प्रशिक्षणार्थींनी घ्यावा असे आवाहन आमदार सिमा हिरे यांनी केले.  पदवीदान दीक्षांत कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या. त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, लवकरच आयटीआयची प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार असून प्रथम हप्ता दोन कोटी मंजूर झाला असून प्रशासकीय इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होईल. त्यामधून नाशिक आयटीआय मध्ये असणा-या प्रशिक्षणार्थ्यांना सर्व आधुनिक सोयीने युक्त अशी इमारत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. समारंभप्रसंगी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी बी. जे. वाघ, शेरिन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड सातपूर तथा आयएमसी चेअरमन सुधीर पाटील, एच ए एल ओझर, प्रशिक्षण विभागाचे प्रबंधक संजय सावळकर, तसेच प्राचार्य राजेश मानकर, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगित सूचना केंद्र सातपूरचे रमाकांत उन्हवणे, उपप्राचार्य मोहन तेलंगी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयटीआय व एच ए एल यांच्यामधील सामंजस्य करारामार्फत संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांना तीन महिने ऑन जॉब ट्रेनिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याव्दारे आयटीयातील प्रशिक्षणार्थी एचएलच्या कारखान्यामध्ये काम करण्याचा अनुभव घेतील.  प्राचार्य राजेश मानकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, येणाऱ्या काळात नाशिक मध्ये जास्तीत जास्त कंपन्यांशी सामंजस्य करार करून प्रशिक्षणार्थींना ऑन जॉब ट्रेनिंग मार्फत कौशल्यपूर्ण प्रशिक्षणावर भर देणार असून लवकरच संस्थेतील मशनरी व इमारतीत नूतनीकरण करण्यात येणार आहे. अध्यक्षीय भाषणात सहसंचालक प्रादेशिक कार्यालयाचे प्रफुल्ल वाकडे यांनी जग झपाट्याने बदलत असून आठ टक्केच त्याचा विकास झाला असून येणाऱ्या तीन वर्षांमध्ये 25% बदल अपेक्षित आहे. त्याकरिता प्रशिक्षणार्थ्यांनी या बदलाला सामोरे जाता यावे. तसेच स्वत:चे ज्ञान आपल्यापुरता व भारतापुरतेच मर्यादित न रहाता जागतिक बदलत्या काळात ठसा उमटविला पाहिजे यावर भर दिला. संस्थेचे उपप्राचार्य मोहन तेलंगी यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रशिक्षणार्थ्यांबरोबरच पालक उपस्थित होते. नरेंद्र ठाकूर व गायत्री गवारे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेतील गटनिदेशक प्रशांत बडगुजर, महेश बागुल, सच्चिदानंद मोरे, दिनेश भामरे आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा:

Back to top button