

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सुरु असलेले खुनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आता मुक्ताईनगर तालुक्यात एका महिलेची अतिशय क्रूरतेने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गवर संत मुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस आज एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. विशेष बाब म्हणजे महिलेची अतिशय क्रूरपणे हत्या केल्यानंतर मृतदेह हा जाड प्लॅस्टीकच्या कॅरीबॅग्जमध्ये भरून तिथे टाकल्याचे आढळून आले. संबंधित महिलेची ओळख पटली नसून, तिचे वय साधारणपणे ४० ते ४५ वर्षाच्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाच्या खालील बाजूस असलेला मृतदेह हा वर काढण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणी पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ओळख पटविण्याचे काम सुरु
कुंड गावाजवळील पुलाच्या खालील बाजूस कॅरीबॅगमध्ये महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली. यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेतली. महिलेची क्रूरपणे हत्या केल्यानंतर मृतदेह जाड प्लॅस्टीकच्या कॅरीबॅगमध्ये टाकून संशयीतांनी पळ काढला. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडून माहिती जाणून घेतली. जिल्ह्यातून बेपत्ता असलेल्या महिलांच्या वर्णनावरून मयत महिलेचे वर्णन पोलिसांकडून तपासण्यात येत आहे.