घनसावंगी; पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील मंदिरातील चोरी झालेल्या मूर्तींची आठवडा उलटूनही पोलिसांना काहीच माहिती मिळत नसल्याने भाविकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. मंगळवारपासून जो पर्यंत आरोपी जेरबंद होत नाहीत, तो पर्यंत घनसावंगी पोलीस ठाण्यासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी बैठकीत घेतला आहे.
जांबसमर्थ येथील स्वामींच्या देव्हाऱ्यातील श्री राम, सीतामाता, लक्ष्मण व हनुमान यांच्या पंचधातूंच्या सहा मूर्ती होत्या. श्री समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागत असताना भिक्षापात्रात ठेवली जाणारी व हाताच्या दंडावर बांधली जाणारी हनुमानाची मूर्तीही या मंदिरात होती. चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास श्रीराम मंदिरातून सहा पंचधातूंच्या मूर्तींची चोरी केली. या घटनेला आठवडा होऊनही पोलिस तपासात काहीच हाती लागत नसल्याने भाविकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. रविवारी ग्रामस्थांनी बैठक घेत प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. मंगळवारपासून चूलबंद अंदोलन करण्याचा र्निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. घनसावंगी पोलीस ठाण्यासमोर निषेध व्यक्त करून जो पर्यंत आरोपी जेरबंद होत नाहीत, तो पर्यंत बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी रामदास स्वामी यांचे अकरावे वंशज भूषण महारूद्र स्वामी, अंबादास अंभोरे, सरपंच बाळासाहेब तांगडे, विलास तांगडे, राजकुमार वायदळ, राजेंद्र तांगडे, अक्षय तांगडे, किशोर मुन्नेमाणीक यांच्यासह महिलांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. दरम्यान, मंगळवारी सकाळी सर्व महिला एकत्रित येऊन मंदिरासमोर जपसाधना करणार आहेत.
हेही वाचा :