धुळे : सैनिकांच्या त्याग व बलिदानामुळेच देश सुरक्षित : आ. कुणाल पाटील | पुढारी

धुळे : सैनिकांच्या त्याग व बलिदानामुळेच देश सुरक्षित : आ. कुणाल पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा

सैनिकांच्या त्याग आणि बलिदानामुळेच आपला देश सुरक्षित आहे. त्यांच्याप्रती प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे. अशा सैनिकांचा सत्कार होणे, हे खर्‍या अर्थाने सौभाग्यशाली असल्याचे प्रतिपादन धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केले. कुंडाणे (वार) येथील सेवानिवृत्त सैनिक विनोद मदन वाघ यांच्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

कुंडाणे येथील विनोद वाघ हे भारतीय स्थल सेनेच्या 21 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांनी भारतीय सैन्य दलात यशस्वी सेवा बजावली. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ग्रामस्थांनी सेवापूर्ती सोहळा आयोजित केला होता. त्यामध्ये आ. पाटील यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. भारताच्या चीन आणि पाकिस्तानलगतच्या सीमा नेहमी अशांत राहात आहेत. अशा प्रसंगी जिवाची बाजी लावत भारतीय सैनिक हे भारतीयांच्या सुरक्षेसाठी सीमेवर लढत असतात. सैनिकांच्याप्रती असलेला अभिमान हा देशाप्रती अभिमान आहे असे पाटील म्हणाले.

या सोहळ्यास धुळे तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष अशोक सुडके, सूतगिरणीचे संचालक कन्हैयालाल पाटील, डी. के. पाटील, चतुर पाटील, श्यामराव पाटील, मदन वाघ, किसन पाटील, बन्सीलाल भदाणे, रूपचंद भदाणे, लामकानी उपसरपंच बाजीराव महाले, बबलू पाटील, पंकज वाघ, सागर अहिरे, चंदू भदाणे, रमेश भदाणे, गुलाबचंद वाघ, बी. एन. पाटील, ताराचंद भदाणे, अनिल शेलार, सचिन वाघ, मुकेश पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button