Jalgaon : पोटाच्या खळगीसाठी आईकडूनच अपत्यांचा सौदा, पोलिसांमुळे टळला माणुसकीला हादरविणारा प्रसंग | पुढारी

Jalgaon : पोटाच्या खळगीसाठी आईकडूनच अपत्यांचा सौदा, पोलिसांमुळे टळला माणुसकीला हादरविणारा प्रसंग

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाच्या लाटेत जीवाभावाची माणसं जग सोडून गेल्याने चिमुकले अनाथ झाले…कोणी वडील गमावले..कोणी आई गमावली…कोणी भाऊ तर कोणी बहीण गमावली…आजही उदध्वस्त झालेल्या कुटुंबांची जीवनाची लढाई सुरू आहे….पण मनाला चटका लावणारा प्रसंग अमळनेर शहरात एका असहाय्य मातेच्या रुपानं जगासमोर आला…कोरोनाने घरातील कर्तापुरुषच गेल्याने उपासमारीत दिवस ढकलत असलेल्या शहरातील एका मातेने आपली आणि चिमुकल्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क आपल्याच मुलामुलींची 20-30 हजारांत विक्री करण्याचा प्रयत्न केला…परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करत मुलांना ताब्यात घेत माणुसकीला काळिमा फासू पाहणारी घटना रोखली.

महिलेच्या पतीचा कोरोनात मृत्यू झाला आणि संकटांची मालिका तिच्यावर आली. मुळात तिच्याकडे कमाईचे काही साधन नसल्याने तिच्यावर एक, दोन नव्हे तर चक्क सात अपत्ये सांभाळण्याची जबाबदारी आली. मुलांचे पालनपोषण कसे करावे, असा प्रश्न भेडसावत असताना तिने थेट नाईलाजास्तव बाजारात एखादी वस्तू विकावी, त्याप्रमाणे आपल्या मुलांना विक्रीस काढले. अमळनेर शहरात गांधलीपुरा भागातील सुभाष चौकात एक महिला चौकात मुले विक्री करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना कळवली आणि एक भीषण प्रसंग जगाच्या नजरेसमोर आला.

अमळनेरचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तत्काळ अधिक तपासासाठी नाजिमा पिंजारी, दीपक माळी, रवींद्र पाटील या पोलिसांचे पथक धाडले आणि पथकाने महिलेचा शोध घेतला. महिलेने आपल्या अडीच वर्षांच्या बाळाला चक्क 15 हजारांत, दुसर्‍या मुलाला 18 हजारांत तर तिसर्‍या मोठ्या मुलीला 25 हजार रुपयांमध्ये विक्रीचा व्यवहार पान 2 वर

ठरवल्याचे पोलिसांना कळताच धक्का बसला. पोलिसांनी हस्तक्षेप करत व्यवहार रोखला आणि सार्‍या कुटुंबाला पोलिस ठाण्यात आणलं.

सात अपत्यांच्या उपजीविकेचा प्रश्न :

पोलिसांनी तिची चौकशी केली आणि त्यांना धक्केच बसले. या असहाय्य महिलेला तीन मुली आणि चार मुले आहेत. महिलेच्या ताब्यातील मुलांबाबत अधिक विचारपूस करून चौकशी केली. आपल्या पतीचे कोरोनाने निधन झाले असून, कर्तापुरुषच मृत झाल्याने स्वतःसह मुलांच्या उपजीविकेसाठी पुरेसे साधन नाही. या मुलांना अन्नाचा एक कणही भरवू शकत नसल्याने आपण मुलामुलींची विक्री करत असल्याचं तिने सांगताच पोलिसही हादरले. जीवन किती परीक्षा पाहते, याची प्रचिती पोलिसांना आली आणि तेही या प्रसंगाने गहिवरले. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या मातेने चक्क 20, 30 हजारांत सौदा ठरवल्याने खर तर तिला अटक करणं पोलिसांना सहज शक्य होतं,परंतु ती ज्या अवस्थेत प्रसंगातून जात आहे, ते पाहता पोलिसांनी संयमी भूमिका घेत तिला समजावले. तिच्या सर्व मुलांना बालसुधारगृहात तर तिला महिला आशादीप वसतिगृहात दाखल करत अमळनेर शहराला काळा डाग लागण्याचा प्रसंग काही अंशी रोखला.

मुलांच्या पालनपोषणासाठी जळगाव शहरातील बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. महिलेसह बालकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जळगाव येथे आणले. तीन मुली व चार मुले अशा एकूण सातही मुलांना जळगाव येथील बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. तर महिलेला जळगावच्या शासकीय महिला आशादीप वसतिगृहात दाखल करण्यात आले आहे. – जयपाल हिरे, पोलिस निरीक्षक

हेही वाचा :

Back to top button