खते, बियाण्यांचा काळाबाजार झाल्यास गुन्हे दाखल करु : ना. भारती पवार यांचा इशारा | पुढारी

खते, बियाण्यांचा काळाबाजार झाल्यास गुन्हे दाखल करु : ना. भारती पवार यांचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्ह्यातील खत उपलब्धतेचा आढावा घेतला. खरीप हंगामात नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध झाली पाहिजे, याद़ृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच खते, बियाणे यांचा काळाबाजार झाल्यास अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, प्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येतील, असाही इशारा दिला.

खरीप हंगाम तोंडावर आला असून, युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांसाठीचा कच्चामाल आयातीवर त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे यावर्षी खतांच्या निर्मितीवर परिणाम होऊन खतांची टंचाई जाणवत आहे. या खरीप हंगामात खतपुरवठ्याचे योग्य नियोजन करून साठेबाजी व काळाबाजार याला आवर घालण्यासाठी सरकार पातळीवरून नियोजन सुरू आहे. दरवर्षी नेमकी शेतकर्‍यांना गरज असतानाच खते, बियाणांचा तुटवाडा समोर येतो. यंदा अशा प्रकारची बाब कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नसल्याचे यावेळी ना. पवार यांनी अधिकार्‍यांना सांगितले.

कांद्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यांत आणले पाणी; मिळतोय कवडीमोल बाजारभाव

यावेळी जिल्हा विकास अधिकारी रमेश शिंदे, मोहीम अधिकारी अभिजित जमधडे यांनी यावर्षी कृषी विभागाने केलेली मागणी, मंजूर झालेले आवंटन व मे महिन्यात प्राप्त झालेली खते यांची माहिती दिली.
जिल्ह्यात खतांचा साठा पुरेसा असला, तरी मंजूर आवंटनापेक्षा कमी खते उपलब्ध झाले आहेत. या महिन्यात मंजूर आवंटनापेक्षा कमी खते उपलब्ध झाल्याची कृषी विभागाकडून माहिती देण्यात आली. यावेळी याबाबत मागणीचे पत्र द्या, गरज पडल्यास केंद्रीय खते व रसायनमंत्र्यांकडे पाठपुरावा करीन, असेही ना. डॉ. भारती पवार यांनी सांगितले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत खते व बियाणे यांचा काळाबाजार होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

हेही वाचा :

Back to top button