नाशिक : जेव्हा लग्नाच्या मिरवणुकीतला गुलाल मशिदीत पडतो
नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
३ मेे रोजी होऊ घातलेल्या रमजान ईद च्या पार्श्वभूमीसोबतच नमाज पठण करतेवेळी भोंगे बंद असावेत अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. त्यासाठी 3 मे चा अल्टिमेटम दिला आहे. अशा परिस्थितीत राजकीय व सामाजिक परिस्थिती बिघडून जातीय-दंगली भडकू शकतात. अशी शक्यता लक्षात घेऊन नाशिक शहर पोलीस आयुक्त व उपायुक्त यांच्या आदेशानुसार सातपूर पोलिसांनी आज (दि. २९) स्वारबाबा नगर लोंढे मार्गावर भडकलेल्या दंगली वर नियंत्रण कसे मिळवावे यांचे प्रात्यक्षिक केले.
यात, लग्नाच्या मिरवणुकीत नवरदेवावर उधळण्यात आलेला गुलाल जवळील मशिदीत पडतो व यावरून हिंदू – मुस्लिम समाजात दंगली उसळतात. यात दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक केली जाते. जाळपोळ केला जातो. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी घोषणाबाजी केली जाते. अशा घटनेचे चित्र उभे केले जाते व सातपूर पोलिस व इतर जवळील पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी सौम्य लाठीमार करून जमा झालेल्या गर्दीला पिटाळून लावतात.
अग्निशमन दलाची वाहने जाळपोळ नियंत्रणात आणतात. अशा स्वरुपाचे हे मॉकड्रिल होते. यावेळी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी आगामी सण-उत्सव व बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे मॉक ड्रिल घेण्यात आल्याचे यावेळी सांगितले. तसेच सातपूर शहर परिसरातील समाजातील सर्व जाती व धर्माच्या लोकांनी एकोप्याने राहण्याचे आवाहन त्यांनी केले.