नाशिक : गोदाघाटावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा : आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रमेश पवार यांनी चक्क रिक्षामध्ये बसून गोदाघाटाची पाहणी केल्यानंतर आढळलेले अतिक्रमण तातडीने हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी (दि. २१)दुपारी गोदाघाट परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले.
गेल्या दोन दिवसापूर्वी मनपा आयुक्त रमेश पवार यांनी रामघाट-गोदावरी नदी भागात प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीत आयुक्तांना पंचवटीत रामकुंड, रामघाट- गोदावरी नदी परिसरात सर्व चहूबाजूंनी विविध व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याचे दिसून आले. ही बाब गंभीर असून गोदावरी नदीचे मोठे नुकसान असून पर्यटकांना, नागरिकांना पायी चालणे कठीण बनले आहे. भर रस्त्यावरील अतिक्रमण दररोज होऊ नये, त्यानुसार आयुक्त पवार यांच्या आदेशानुसार बुधवारी (दि.२०) रोजी उपायुक्त करूणा डहाळे यांनी तातडीने पंचवटी, पूर्व व पश्चिम विभागीय अधिकारी आणि अतिक्रमण विभाग यांच्या संयुक्तपणे पाहणी करून ध्वनी प्रक्षेपणद्वारे पंचवटी-रामकुंड ते संत गाडगेबाबा पूल व संपूर्ण गोदावरीच्या भागात अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार गुरूवारी (दि.२१) पूर्व व पश्चिम आणि पंचवटी विभागीय कार्यालयाकडून पंचवटी-गोदावरी नदी, रामघाट भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त करूणा डहाळे, उपायुक्त दिलीप मेनकर, गोदावरी संवर्धन कक्षाचे उपायुक्त विजयकुमार मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया, पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, पूर्व विभागीय अधिकारी नवनित निकम, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिक्षक धामणे, सहायक अधिक्षक भुषण देशमुख, राजेश सोनवणे, दीपक मिंदे, प्रकाश उखाडे, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रवीण बागूल, नाना अभंग, पंचवटीचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश खैरनार आदींसह मनपा अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचारी आणि पोलीस पथक उपस्थित होते. या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत गोदावरी नदीच्या दोन्ही काठावरील मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण हटविण्यात आले. त्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर गोदाघाटाने मोकळा श्वास घेतला.
व्यावसायिकांनी नदीकाठी अतिक्रमण करू नये व मनपाला सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे पंचवटीत रामकुंड, रामघाट-गोदावरी नदीच्या काठावर व्यवसाय करण्यासाठी बंदी घालण्यात येणार आहे. मनपाचे आणि गोदावरी नदीचे कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही, याबाबत मनपासह अधिकृत व्यावसायिकांकडून काळजी घेतली जाणार आहे.
– करूणा डहाळे, मनपा उपायुक्त, नाशिक