नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
कार्यक्रम घेण्याची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. भारतीय संविधानात नागरिकांना एकत्र जमण्याचे अधिकार आहेत, मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या अटीत राहून हे अधिकार आहेत. पोलिस आयुक्तांच्या आदेशाबाबत विरोध असल्यास याबाबत उच्च न्यायालयात किंवा राज्य शासनाकडे दाद मागावी, असे आवाहन पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले आहे.
रविवारी (दि.13) शहरात भाजपतर्फे विविध विकासकामांच्या शुभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमांना पूर्वपरवानगी घेतली नसल्याने शहर पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हे दाखल करून भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांना अटक केली. या आधीही विनापरवानगी कार्यक्रम घेतल्याप्रकरणी राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या आदेशाविरोधात राजकीय पक्षांमध्ये नाराजी असून, रविवारीदेखील भाजप पदाधिकारी व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी सांगितले की, नागरिक, राजकीय पक्षांनी परवानगी घेऊन कार्यक्रम घ्यावेत, अशी अपेक्षा आहे. रविवारी झालेल्या घटनेचा आढावा घेतला जाईल.
आवश्यकता भासल्यास राजकीय पक्षांना समज देऊ. ज्यांना पोलिस आयुक्तांचे आदेश चुकीचे वाटत असतील त्यांनी उच्च न्यायालयात आदेशास आव्हान द्यावे. आगामी मनपा निवडणुकांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत अंमलबजावणी करावीच लागेल त्यास पर्याय नाही, असेही पोलिस आयुक्त पाण्डेय म्हणाले.
भाजप पदाधिकार्यांविरोधात चार गुन्हे
रविवारी विनापरवानगी कार्यक्रम घेऊन शेकडो नागरिकांची गर्दी जमवल्याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात माजी महापौर सतीश कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्याविरोधात एक तर कैलास निवृत्ती शिंदे व जालिंदर शिंदे यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे पंचवटीतदेखील माजी महापौर, भाजप शहराध्यक्ष यांच्यासह इतर चौघांविरोधात गुन्हा दाखल आहे. तर भद्रकाली पोलिस ठाण्यात आंदोलनास दिलेल्या परवानगीच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालवे यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.