नाशिक : महिलांवरील अत्याचार कमी होईना ; दोन वर्षांत हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ
नाशिक : पुढारी वृत्तसेवा : ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांना देण्यात आलेले हक्क, समान संधी, २१ व्या शतकातील सक्षम महिला आदींबाबत महिला दिनानिमित्त सर्वत्र चर्चा व इतर महिला सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित करून अनेक जणींचा गौरव केला जातो. आजची महिला एकीकडे सक्षम, स्वतंत्र, स्वावलंबी आहे, तर दुसरीकडे परावलंबी, असुरक्षित, कमजोर असल्याचे विषम चित्र दिसून येते. आजदेखील महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहता गत दोन वर्षांत ही आकडेवारी जागतिक, राष्ट्रीय, राज्यपातळीवर तसेच स्थानिक स्तरावर झपाट्याने वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटना व एनसीआरबी अहवालानुसार आढळते. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी करण्याचे पोलिसांसह सामाजिक क्षेत्रात कम करणाऱ्या घटकांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.
देशात २०२० च्या एनसीआरबी अहवालानुसार ३.७१ लाख महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सरासरीनुसार ९८८ तक्रारी रोज नोंदविण्यात आल्या होत्या.
मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, जयपूर, हैदराबाद, लखनऊ ही शहरे हॉटस्पॉट राहिली आहेत.
राज्यात एनसीआरबी अहवालानुसार २०२० मध्ये दर दोन तासांनी महिलांविरुद्ध गुन्हे नोंदणी झाली. त्या अन्वये १८,७६९ अल्पवयीन व महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे खून, खुनाचा प्रयत्न, ॲसिड हल्ला, हुंडाबळी मृत्यू, आत्महत्येस प्रवृत्त, गर्भपात आदी जवळपास ३१,९५४ गुन्हे महाराष्ट्रात नोंदविण्यात आले आहेत. याप्रमाणे प्रत्येक राज्याची टक्केवारी वेगवेगळी आहे. नाशिक शहर-जिल्ह्यातही दोन वर्षांत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या गुन्हेगारीत वाढ झालेली आढळते.
बलात्कार (कंसात विनयभंगाची आकडेवारी)
वर्ष गुन्हे दाखल निकाली
2018 54 (180) 52 (175)
2019 58 (205) 57 (191)
2020 57 (181) 55 (65)
2021 65 (88) 65(85)