‘ती’ कुटुंबातील महत्त्वाचा घटक होती; पण घराच्या उंबरठ्याच्या आताच तिच अस्तित्व होतं. प्रत्येक गोष्टीत तिला गृहीत धरणं हा अलिखित नियमच होता. मात्र तिने आपल्या कर्तृत्वाने हा नियम कालबाह्य केला. आज महिलांनी (IWD 2022) प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे. मात्र यासाठी मागील पिढीने मोठी खडतर वाट तुडवली आहे. त्यांनी केलेली अमूल्य कामगिरी ही प्रत्येक महिलांसह संपूर्ण समाजाला आदर्श ठरली आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. जाणून घेवूया देशातील विविध क्षेत्रांमध्ये सर्वप्रथम आपला ठसा उमटविणार्या आणि ऐतिहासिक कामगिरी करणार्या महिलांविषयी…
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी – झाशीची राणी लक्ष्मीबाई
मनकर्णिका म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई. ब्रिटीशांविरोधातील असामान्य लढा दिला. आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगाच्या इतिहासावर उमटविला. केवळ २७ वर्षांच्या या निर्भय, पराक्रमी, तेजस्वी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या मनात धास्ती निर्माण केली होती. त्यांच्या कर्तृत्वाचे एका कवयित्रीने समर्पक वर्णन केले आहे, खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी… त्यांचा पराक्रम आजही महिलांना जगण्याचं बळ देवून जातो.
पहिल्या महिला शिक्षिका – सावित्रीबाई फुले
अनेक संघर्षांना सामोरे जात महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या सावित्रीबाईं फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत. त्या फक्त शिक्षिकाच नव्हत्या तर उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका होत्या. त्यांनी आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मदतीने समाजातील अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा विरोधात आवाज उठवला. महिलांसाठी शाळा आणि सामाजिक संस्था स्थापन केल्या.
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान – इंदिरा गांधी
‘आर्यन लेडी’ अशी ओळख असलेल्या इंदिरा गांधी या भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. १९६६ मध्ये त्या पंतप्रधान झाल्या. विशेष म्हणजे त्यांनी सलग तीनवेळा पंतप्रधान पदाचा पदभार सांभाळला होता. देशातील सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ मिळणार्या त्या पहिली महिला ठरल्या.
देशातील पहिली राष्ट्रपती – प्रतिभाताई पाटील
देशातील पहिल्या महिला राष्ट्रपती हाेण्याचा बहुमान प्रतिभा देवीसिंह पाटील यांना मिळाला. त्यांनी २००७ ते २०१२ या काळात राष्ट्रपती पदाचा पदभार सांभाळला. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत राजस्थानच्या राज्यपाल, राज्यसभा सदस्य, महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री अशी अनेक पदे सांभाळली आहेत.
भारतातील पहिली महिला राज्यपाल – सरोजिनी नायडू
स्वातंत्र्य सेनानी, कवयित्री सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. एकेकाळचा संयुक्त प्रांत म्हणून ओळखला जाणारा व आताचा उत्तर प्रदेश राज्याच्या त्या १९४७ ते १९४९ या कालखंडात राज्यपाल होत्या.
पहिल्या महिला केंद्रीय मंत्री – राजकुमारी अमृता कौर
राजकुमारी अमृता कौर यांनी स्वतंत्र भारताच्या पं. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात आरोग्यमंत्री पदभार साभाळला. राजकुमारी अमृता कौर या देशाच्या पहिल्या महिला केंद्रीय मंत्री होत्या.
भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री – सुचेता कृपलानी
स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी होत्या. १९६३ साली त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. त्या देशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. १९६३ ते १९६७ या काळात त्यांनी उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळला.
पहिली भारतीय महिला डॉक्टर – डॉ. आनंदीबाई जोशी
डॉ. आनंदीबाईवयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी १८८६ साली डॉक्टर होवुन केवळ आपल्या देशाचा गौरवच वाढविला नाही तर सगळयांकरीता एक आदर्श ठरल्या. डॉ. आनंदीबाई गोपाल जोशी १९व्या शतकात अमेरिकेस जाऊन वैद्यकीय पदवी घेतली. आणि भारतातील स्त्रियांची सेवा करण्याचे व्रत घेऊन भारतात परतल्या. डॉ. आनंदीबाई विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणार्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर (M. D.) ठरल्या.
नोबेल पारितोषिक विजेत्या – मदर तेरेसा
आनियास गोनिया बोयाचे उर्फ मदर तेरेसा या भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या. १९७४ मध्ये त्यांनी भारताचं नागरिकत्व घेतलं. इ.स. १९७९ मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आणि त्या भारतातील पहिल्या महिला नोबेल पारितोषिक विजेत्या ठरल्या.
पहिल्या महिला लोकसभा सभापती – मीरा कुमार
देशाचे माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या असलेल्या मीरा कुमार या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती ठरल्या. त्यांनी सासाराम येथील मतदारसंघातून कॉग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. २००९ ते २०१४ या काळात त्या लाेकसभा सभापती हाेत्या.
सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधीश – फातिमा बिबी
फातिमा बिबी मिरासाहेब भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधीश. त्यांचे पूर्ण नाव मीरा साहिबा फातिमा बिबी असे होते. ६ ऑक्टोबर १९८९ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून त्याची निवड झाली.
पहिली महिला ऑस्कर पुरस्कार विजेत्या – भानू अथैय्या
वेषभूषाकार भानू अथैय्या या ऑस्कर पुरस्कार विजेत्या असलेल्या पहिल्या भारतीय महिल्या ठरल्या. त्या मूळच्या कोल्हापूरच्या. भानू यांनी ‘एकादशी महात्म्य’ या चित्रपटात बालकलाकार म्हणूनही काम केले होते.
पहिली भारतीय मिस वर्ल्ड – रीता फारिया पॉवेल
पहिली भारतीय मिस वर्ल्ड रीता फारिया पॉवेल. त्यांनी १९६६ मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकलं. त्या मॉडेलबरोबरच डॉक्टरही होत्या.
पहिली भारतीय मिस युनिव्हर्स – सुष्मिता सेन मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी सुष्मिता ही पहिली भारतीय महिला ठरली होती. १९९४ साली तिने हा किताब जिंकला आणि भारताची मान अभिमानाने उंचावली.