

मुंबई : अयोध्येतील राम मंदिरातील निधीचा अपहार आणि दानपेटीतील कथित चोरीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईत स्वतः उद्धव ठाकरे यांनी या रामरक्षा आंदोलनाची सुरुवात केली. त्यावर, शेवटी उद्धव ठाकरेंना राम आठवले याचा आनंद आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.
रविवारी चंद्रपूर येथे ठाकरेंच्या या आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मला आनंद आहे की, शेवटी उद्धवजींना राम आठवले. आमची अपेक्षा एवढीच होती की त्यांना राम आठवले पाहिजे. त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. राम मार्गाने चालले तर त्यांचे भले होईल. केवळ आजच्या पुरतेच नाही तर त्यांनी रोज रामरक्षा म्हणावी, असेही ते म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातील दानचोरीप्रकरणी आंदोलनाची हाक दिल्याने येत्या काळात यावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. राज्यातील प्रत्येक गावात राम मंदिर, हनुमान मंदिर आणि जिथे मंदिर नसेल तिथे भररस्त्यात राम प्रतिमा लावून आंदोलन करा, रामरक्षा स्तोत्र - मारुती स्तोत्र आणि हनुमान चालिसा म्हणत रामरक्षा आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.