

नवी मुंबई: ३० ऑक्टोबर २०२३ रोजी तुर्भे एमआयडीसीतील परवेझ अय्युब कुरेशी या २१ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला होता. तथापि चार फूट खोल पाण्यात मुलाचा बुडून मृत्यू होणे शक्यच नसल्याचा दावा करत उपलब्ध सीसीटीव्हीच्या आधारावर आपल्या मुलाची हत्याच झाल्याचा आरोप मृत युवकाचे वडील अय्युब कय्युम कुरेशी यांनी केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिलेले असतानाही पोलिसांनी त्या निर्देशालाही जुमानले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ज्या खाणीमध्ये मुलाचा मृतदेह सापडला, त्या खाणीमध्ये अवघे चार फुटापर्यत पाणी असल्याने बुडून मृत्यू कसा झाला असा प्रश्न उपस्थित करत कुरेशी यांनी घटनास्थळावरील उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण मिळविले असून त्यामध्ये मुलाचा मृतदेह रिक्षातून आणणे, रिक्षामधून बाहेर काढणे, पाण्याच्या दिशेने नेणे, पाण्यात टाकण्यापर्यंतच्या हालचाली या सर्वांचा समावेश असल्याचे कुरेशी यांचे म्हणणे आहे.
या प्रकारात अनेक व्यक्तिचा सहभाग असल्याचाही आरोप कुरेशी यांनी केला आहे. येथील त्यांनी नवी मुंबई महापालिका, तुर्भे पोलीस ठाणे, ठाणे येथील लघु न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, मुंबईतील कलिना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचानलालय, भायखळा येथील जे. जे. शवविच्छेदन केंद्र व अन्यत्र माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविली असता, त्यांना माहितीमध्ये तसेच शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत, अहवालामधील माहितीत विसंगती आढळून आली असल्याचे कुरेशी यांचे म्हणणे आहे.
पाण्यातून बाहेर काढण्यात आलेल्या मृतांची डायटॉम टेस्ट करण्यात येते. हिस्टोपॅथॉलॉजी, रक्ततपासणी, व्हिसेरा आदी कोणत्याही तपासण्या झालेल्या नाहीत. शवविच्छेदनाची सर्व प्रक्रिया व सर्व अहवालच संशयास्पद असल्याचा आरोप अय्युब कुरेशी यांनी केला आहे.
मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी पावणे तीन वर्षे अय्युब कुरेशी स्थानिक तुर्भे पोलीस ठाण्यापासून ते केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधानांपर्यत लेखी पाठपुरावा करत आहे. त्यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचाही प्रयत्न केला मात्र तीन वकीलांकडून त् यांची फसवणूक झाली. या वकीलांनी प्रत् येकी ४० हजार रुपये कुरेशी यांच्याकडून उकळले.
मात्र पैसे घेवूनही त् यांना वकीलांनी न्यायालयापर्यंत येऊ दिले नाही. वकीलांची फी भागवण्यासाठी कुरेशी यांनी गावाकडची जमीनही विकली.नवी मुंबई महापालिका, नवी मुंबई पोलिस यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याने कुरेशी यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, सीबीआयलाही तक्रार करत न्यायासाठी साकडे घातले आहे. प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप यांनी केला आहे.
कुरेशी यांच्या मागण्या शवविच्छेदनाची संपूर्ण प्रक्रिया तज्ज्ञ समितीकडून करण्यात यावी. मृत्यूचे कारण निश्चित करताना घेतलेल्या निकषांची चौकशी करण्यात यावी. चुकीच्या नोंदी, वैद्यकीय नियमांचे उल्लंघन, चुकीची प्रक्रिया राबविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.