

Tukaram Mundhe Savji Controversy: सावजी खाद्यपदार्थ ही नागपूरची अतूट अशी एक ओळख आहे,मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एका वक्तव्याने नागपूरचा सावजी पदार्थ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पाहूया काय आहे सावजी खाद्य पदार्थांचा हा वाद.
झंजझणीत, तिखट, थोडं जास्त तेल... व्हेज किंवा नॉन व्हेज.. नागपूरच्या सावजी खाद्य पदार्थाची चवच न्यारी... नागपूरचे सावजी मटण असो की चिकन.. दुरदुरुन खाद्यप्रेमी याचा आस्वाद घ्यायला नागपूरात येतात.. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या एका वक्तव्या मुळे नागपूरचा सावजी पदार्थ पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
"सावजी खाल्ल्याने मला महिनाभर रुग्णालयात राहावं लागेल" तुकाराम मुंढे यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आलीय. यापूर्वी त्यांना सावजी मटण अथवा चिकन खाल्ल्याने कधी त्रास झाला नाही असे ग्राहकांचे म्हणणे आहे.
सावजी पदार्थ हा केवळ नागपूरचा विशेष खाद्यपादार्थ नाही तर त्याला एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. नागपूर हा कधीकाळी मध्य प्रदेशाचा भाग होता,ब्रिटिश राजवटीत याला 'सेंट्रल प्रॉव्हिन्स अँड बेरार' म्हणजेच 'सिपी अँड बेरार' नावाने ओळखले जायचे. जमशेदजी टाटा यांनी नागपूरात 'एम्प्रेस मिल' ही गिरणी उघडल्यावर मध्य प्रदेशातील विणकर कारागीर मोठ्या प्रमाणात नागपूरात वास्तव्यास आले होते.
त्यानंतर मॉडेल मिल ची सुरवात झाल्याने या विणकर कारागिरांची संख्या वाढली.मात्र हे विणकर कामगार आले ते आपली खाद्य संस्कृती सोबत घेऊन,तीच कालांतराने सावजी म्हणून प्रचलित झाली.
सावजी हे खासकरून त्याचा झनझणीत, तिखट स्वादासाठी ओळखले जाते. त्याचप्रमाणे सावजी पदार्थांमध्ये वापरण्यात येणारे मसाले हे त्याची विशिष्ट आणि वेगळी चव ठरवतात. सावजी पदार्थ खाताना थोडी काळजी घेतल्यास ते शरीराला हानिकारक नसल्याचे डॉक्टर सांगतात, तर सावजी खाऊन रुग्णालयात जायची कुणावर वेळ आली नाही असं सावजी हॉटेल संचालक सांगतात.
एखाद्या शहराची ओळख जशी त्याच्या ऐतिहासिक म्हत्वावरून होते तशीच त्या शहराला तेथील विशिष्ट खाद्य पदार्थामुळे देखील ओळखले जाते. विशिष्ट खाद्यपदार्थ हे त्या शहराचे वैभव असतं. सावजी खाद्य पदार्थ आणि नागपूर अशीच ही ओळख घट्ट बनली आहे.
नागपूरच्या सवजीची चव चाखायला दुरदुरुन लोक येतात, अशात ते खाल्ल्याने आजारी होऊन रुग्णालयात दाखल होणार या विधानावर सावजी प्रेमींकडू एकीकडे जोरदार टीका होत आहे. तर दुसरीकडे तुकाराम मुंढे यांच्या या वक्तव्यामुळे सावजी पदार्थांना संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा तडका मिळाला आहे एवढे निश्चित.