

NCP internal dispute Maharashtra
मुंबई: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच विरोध झाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी आपल्या वकिलांमार्फत सुनेत्रा यांच्यासह ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनाही नोटीस पाठवून अध्यक्षपदासह सर्व प्रमुख पदांची पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.
या नोटीस 'बॉम्ब'मुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, ही नोटीस आल्यामुळे राजकीय क्षेत्रातही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा २१ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे नाव अध्यक्ष पदाच्या चर्चेत आले होते.
परंतु, जनभावना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विरोध ओळखून वरळी येथे २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्यास सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली.
परंतु, चार महिने झाल्यानंतर आता या निवडीला आक्षेप घेण्यात आला आहे. याबाबत सुनेत्रा पवार यांच्यासह सच्चिदानंद सिंह यांनी पटेल आणि श्रीवास्तव यांना नोटीस बजावली आहे.