

मुंबई : आज देश बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय. पण विरोधकांचे विचार मात्र बदलत नाहीत, अशा परखड शब्दांत भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी विरोधकांना सुनावले. ते सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते.
केंद्र व राज्य सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे. नक्षलवाद संपुष्टात आणण्याची भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात नक्षलवाद संपवला. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात स्टील फॅक्टरी आणून तेथील आदिवासींचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न ते करत आहेत. असे असताना विरोधक मात्र राज्याला बदनाम करत आहेत, असे दरेकर यांनी ठणकावले.
विरोधकांच्या टीकेवर पलटवार करताना दरेकरांनी सभागृहात फुगेवाडीच्या एका रहिवाशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत व्यक्त केलेल्या भावनांचे पत्रच वाचून दाखवले. देवाभाऊ, आपण या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवत आहात याचा गर्व असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
विचार मिसिंग झालेले लोक
कनेक्टिंग लिंकवरून टीका करणाऱ्या विरोधकांवर आसूड ओढत दरेकर म्हणाले, आपल्यासमोर विचार मिसिंग झालेली लोकं बसली आहेत. माणसं जोडणारे मुख्यमंत्री इकडे बसले आहेत. राज्यात क्रांतिकारी असे कनेक्टिंग लिंक केले. निसर्ग कोपला की काय होते हे महाराष्ट्राने पाहिले आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडला, आपत्ती आली तर दुर्घटना घडतात. त्या दुर्दैवी आहेतच. पण घटनेचे राजकारण करणे हे महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला शोभणारे नाही.
मुंबई-पुण्याला जोडणारा कनेक्टिंग लिंक हा आदर्श प्रकल्प आहे. यामुळे एक दीड तासाचे अंतर कमी झाले. जगाला हेवा वाटेल असा हा प्रकल्प झाला आहे. आपल्या राज्याला चांगले मुख्यमंत्री लाभले याचा अभिमान पाहिजे. त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांचे पाय खेचण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमानच आहे, असे दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, राजकारणात आपला पक्ष वाढवता येत नाही, विचार टिकवता येत नाहीत, जिंकता येत नाही म्हणून राज्याला प्रगतीकडे नेणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर असे आरोप करता. विरोधकांनी महाराष्ट्राचे राजकारण जातीपातीत केले. मात्र मराठा समाजाला न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. ज्यांनी मराठा आंदोलन उभे केले त्या मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचे जाहीरपणे कौतुक केले आणि तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करताहात. जातीय तेढ तुम्ही निर्माण करणार व बोट दुसऱ्याकडे दाखवणार, हे पाप विरोधक करताहेत असे सुनावतानाच अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘सत्ता आती है, जाती है, बनती है, बिघडती है, पर देश रहना चाहिए, या ओळींची आठवणही दरेकरांनी विरोधकांना करून दिली.
रमेश म्हात्रेंनी चूकच केली
रमेश म्हात्रे यांनी केलेली मारहाण चुकीची आहे. त्यांना गुन्हा दाखल होऊन अटकही झाली. महाडला नगरसेवक सुरज बामणे यांनी चुकीचे काम झाले म्हणून अधिकाऱ्यावर हात उचलला. तेथील पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. देवाभाऊंच्या राज्यात नगरसेवक रमेश मात्रे, महाडच्या बामणेवर गुन्हा दाखल झाला. नरसापुरच्या आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवले आणि पीडितेला व तिच्या कुटुंबीयांना न्याय दिला. याला पारदर्शक सरकार म्हणतात, याची आठवणही दरेकर यांनी करून दिली.
विरोधक नगर विकास खात्यावर बोलताना पालिकेतील भ्रष्टाचार बोलत आहेत. महापौर रस्त्यावर पाण्यात उतरल्या तरी त्यांच्यावर टीका होते. मेट्रो वुमन अश्विनी भिडेंना लक्ष्य करताहेत. अस्मानी संकटाला सर्वांनी मिळून साथ द्यायची असते. वर्षानुवर्षे मुंबईला पावसाच्या पाण्याने घेरले आहे. आम्ही तातडीने उपाययोजना करतोय. पूर प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १३ हजार कोटीचा कृती आराखडा आता तयार केला.
केंद्राकडे तशी मागणीही केली आहे. याचे कौतुकही करण्याची गरज आहे. जनता आपल्याला का नाकारतेय याचे विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. जोपर्यंत दृष्टीकोन बदलणार नाही तोपर्यंत पुढील शंभर वर्ष जनता विरोधकांना सत्तेत आणणार नाही. सत्ता येते नी जाते, परंतु नेतृत्वाने बदलले पाहिजे, असा टोलाही दरेकरांनी विरोधकांना लगावला.
बीडीडीच्या धर्तीवर नायगाव पोलिसांनाही घरे द्यावीत
ज्या प्रकारे वरळी बीडीडी येथील पोलिसांना घरे दिली त्याच धर्तीवर नायगाव येथील पोलिसांनाही तेवढेच नाममात्र पैसे आकारून घरे द्यावीत व पोलीस पत्नींना न्याय द्यावा. मुंबईत बाहेरून येणाऱ्याला एसआरएमध्ये घर मिळते व पिढ्यान् पिढ्या सेवा देणाऱ्या पोलिसांना आपण घर देणार नसू तर त्यांच्या योगदानाचा अपमान ठरेल, असेही प्रवीण दरेकर यांनी नमूद केले.