

मुंबई : महापालिका निवडणुकीतनंतर पहिल्याच सभेत पालिका मुख्यालयातील सभागृहातील जागेचा प्रश्न ऐरणीवर आला. बसायला जागा नसल्याने सभेत काँॅग्रेसच्या व इतर नगरसेवकांनी गोंधळ घातला. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या गटनेत्यांच्या पहिल्याच बैठकीत तात्पुरती व्यवस्था म्हणून सभागृहाची अंतर्गत रचना बदलता येईल का याची चाचपणी करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या 227 आहे. यात आता नामनिर्देशित 10 नगरसेवक, सचिव विभागातील 10 कर्मचारी आणि काही माध्यम प्रतिनिधी असे मिळून एकूण 260 ते 270 पर्यंत संख्या जात आहे. त्यामुळे जागेची अडचण निर्माण झाली आहे.
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत महापालिका सचिव मंजिरी देशपांडे, सभागृह नेते गणेश खणकर, काँग्रेस, उबाठा, मनसे आणि एमआयएम आदीं पक्षातील गटनेत्यांनी सभागृहाची पाहणी केली. आणि यानंतर महापौर रितू तावडे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. इमारत ऐतिसाहिक वास्तू असल्याने त्याचे कुठेही नुकसान न होता, कुठलाही बदल न करता फक्त सभागृहातील पुतळे सरकविण्याचा आणि सचिव विभागातील कर्मचारी संख्या कमी करण्याचा निर्णय सध्या तरी पालिका प्रशासनाने घेतला आहे. जेणेकरून नामनिर्देशित 10 सदस्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध होईल, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
सभागृहात असलेली जुनी माईक सिस्टिम बदलून नवी आधुनिक माईक सिस्टिम बसविण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून केला जाणार आहे. यामुळे छतापासून लटकलेले माईक आता इतिहास जमा होणार आहेत.
महापौर निवडणुकीच्या दिवशी सभागृहात जागा अपुरी पडल्याचे दिसून आले. मात्र भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी सभागृहातील पुतळे सरकविण्याचे आणि सचिव विभागातील मोजके कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल.
भूषण गगराणी, आयुक्त, मुंबई महापालिका